नगर – विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू आहे. नगर शहर मतदार संघासाठी मंगळवार (दि.1) रोजी एकाही इच्छुक उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र, दहा जणांनी काल तिसऱ्या दिवशी 16 उमेदवारी अर्ज घेतले आहेत.कालअखेर 52 व्यक्तींनी 70 अर्ज नेले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची धामदुम सुरू आहे. भारत निवडणूक आयोगाने आचारसंहिता जारी केल्यानंतर अधिसूचना जारी झाल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नगर शहर मतदारसंघाकरीता प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकारी पदाची सूत्रे आहेत. तर नगर तहसीलदार उमेश पाटील हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. काल विधानसभा मतदारसंघाकरीता आयोगाच्या घोषणेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा तिसरा दिवस होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत मंगळवार रोजी एकाही इच्छुक उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.