नाणे मावळ, {अतुल चोपडे} – लोकसभेची निवडणूक अवघी दहा दिवसांवर आली आहे. त्यामुळे उन्हासोबतच प्रचाराचा पाराही चढला आहे. चला उठा निवडणूक आली… प्रचाराला जायची वेळ झाली… असे म्हणत भाडोत्री प्रचारकांचे ठेकेदार आता मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात फिरू लागले आहेत.
दिवसभराच्या प्रचारासाठी ५०० ते ७०० रुपयांसह जेवण, चहा, नाश्ता मिळत आहे; तर राजकीय सभा, प्रचार फेरी यासाठी स्वतंत्र पॅकेज तयार केले आहे. निवडणुका आल्या की आपल्या मागे किती जनता आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून होतच असतो. काही वेळेस गर्दी बघूनच विरोधी उमेदवाराला धडकी भरते. त्यामुळे गर्दी जमा करण्यासाठी सर्वच उमेदवारांचे प्रयत्न सुरू असतात.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे कार्यकर्ते सदैव बरोबर राहतील, असे नाही. कार्यकर्त्यांबरोबरच मतदारांची गर्दी दिसावी म्हणून भाडोत्री प्रचारकांचे ठेकेदार आता उमेदवारांशी संपर्क साधत आहेत.
प्रचार कशा पद्धतीचा आहे, यावर या ठेकेदारांनी पॅकेज तयार केले आहे. दिवसभराचा प्रचार असेल तर दोनवेळचे जेवण, महिलांसाठी ५०० रुपये, पुरुषांसाठी ७०० रुपये निश्चित केले आहेत. महागाई वाढल्याने ही रक्कम वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच राजकीय नेत्यांची मोठी सभा असेल, तर वेगळा दर असणार आहे. सभा संपल्यानंतरच पैसे दिले जाणार आहेत. कारण, अनेक लोक मध्येच उठून जातात. गर्दी कमी असल्याचे फोटो व्हायरल होतात. सभा संपेपर्यंत थांबणे या अटीवर दर ठरवले जात आहेत.
उमेदवारांच्या मागणीनुसार पॅकेज
प्रचार फेरी, कोपरा सभेसाठीही ठेकेदारांनी पॅकेज तयार केले आहे. सभा कधी, कुठे होणार हे अगोदर सांगणे बंधनकारक आहे. कारण, एकाच प्रचारकाला दिवसभरात दोन वेगवेगळ्या सभेत पाठवण्याचे नियोजन करता येते, असे ठेकेदारांचे मत आहे. यासाठी झोपडपट्टी, तसेच परप्रांतीय नागरिकांशी संपर्क साधला जात आहे.
सभेत घोषणाबाजी करून वातावरण निर्माण करण्यासाठी तरुणांची स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या मागणीनुसार पॅकेज दिले जाणार आहे. त्यामुळे भाडोत्री प्रचारकांचा भाव या निवडणुकीत चांगलाच वधारला आहे.
शेतीकामापेक्षा प्रचार बरा
प्रचारासाठी आता दिसणारे अनेक मजूर हे शेतीमध्ये काम करीत होते. सध्या उन्हाचा पारा ४० अंशावर गेला आहे. त्यामुळे शेतीतील मेहनतीचे काम करण्यापेक्षा त्यांना प्रचाराचे काम अधिक सोपे वाटत आहे. याशिवाय दोन वेळचे जेवण, चहा आणि नाश्ता मिळतो. याशिवाय प्रचार केल्यावर लगेच सायंकाळी ठेकेदाराकडून पगार दिला जातो. यामुळे मजुरांचा कल शेतीकामा ऐवजी प्रचाराकडे अधिक आहे.