पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या एकमेव वल्लभनगर आगारामधून दिवसाला सहा ते आठ हजार प्रवासी प्रवास करतात. उद्योगनगरी असल्याने शहरात रोजीरोटी तसेच शिक्षणानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिकांचा त्यात समावेश आहे.
मात्र, सध्या उन्हाळी सुट्टीमुळे जादा बसची मागणी तर, मतदानासाठी एसटी बसची मागणी असल्याने आगारात आधीच एसटी बसची संख्या कमी असताना दिवसाला एक ते दोन बसचे ब्रेकडाऊन होत आहेत. परिणामी आधीच तुटवडा निर्माण होत असताना एन हंगामात आता ब्रेकडाऊनच्या बसची भर पडत असून उन्हाळी विशेष फेऱयांचे नियोजन कोलमोडत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात एकमेव वल्लभनगर आगार आहे. त्यामुळे हे आगार प्रवाशांनी फुल्ल असते. त्यातच एसटीने प्रवाशांसाठी विविध योजना लागू केल्या आहेत. परिणामी प्रवाशांचा ओढा वाढला आहे. त्यातच ज्येष्ठ नागरि, महिलांसाठी विशेष योजना असल्याने त्यांची अधिक पसंती एसटी बसला मिळत आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असून गावी जाणाऱयांनी संख्या अधिक आहे.
त्यातच एसटीच्या पिंपरी-चिंचवड आगारात प्रवाशांच्या मानाने वाहनांचा तुटवडा आहे. त्यातच दिवसाकाठी हमखास एक ते दोन बस वारंवार ब्रेक डाऊन होत असल्याने उन्हाळी विशेष फेऱ्यांची नियोजन कोलमडत आहे. दिवसाला एक ते दोन गाड्या पडताहेत मार्गावरच बंद पडत आहेत. त्याचा प्रवाशांनाही नाहक मनस्त सहन करावा लागत आहे. परिणामी, लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवाशांना तासनतास वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आगारात दिसून आले.
कर्मचाऱयांचा तुटवडा
कार्यशाळेत चाळीस जणांचा कार्यभार पंचवीस कारागीरच पार पाडत आहेत. कामगारांचा तुटवडा असल्याने एसटी बसच्या दैनंदिन तपासणी करताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. परिणामी ब्रेकडाऊनची संख्या वाढताना दिसत आहे. त्याचा थेट परिणामी प्रवाशांवर होत आहे.
एनवेळी लांबचे मार्ग रद्द
उन्हाळी सुट्टीचे एसटी आगाराकडून नियोजन करण्यात आले आहे. यानिमित्त नाशिक, चिपळूण, उमरगा, सोलापूर यासह विविध मार्गांवर अतिरिक्त बस सोडण्यात येत आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या बस कमी पडत आहेत. त्यातच दिवसाकाठी हमखास एक ते दोन एसटी ब्रेक डाऊन होत आहेत.
त्यामुळे काही मार्ग वगळावे लागत असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात वाहनांचा मोठा तुटवडा आहे. बंद पडलेल्या बस वेळेवर दुरुस्त होत नसल्याने, लांबचे मार्ग रद्द करून इतर मार्गावर ती सेवा वळवावी लागत आहे.