नगर – महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत महानगरपालिका शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत प्लॅस्टिक बंदीसाठी मोहिम सुरु केली मात्र, शहरात ठिक-ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पडले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे मात्र पालिकेने दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.
महानगरपालिकेकडून स्वच्छता हीच सेवा’ ही मोहीम 1 ते 3 ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येत आहे. शहरातील प्लॅस्टिक संकलित करण्यासाठी महापालिका कर्मचारी व्यावसायीक, तसेच घरोघरी जाऊन प्लॅस्टिक बाबत मार्गदर्शन करत आहेत. या मोहिमेत सामाजिक संस्था, बचतगट ही सहभागी होत आहेत.
आज स्वता: मनपा आयुक्त हे शहरात प्लॅस्टिक बंदी बाबत मार्गदर्शन करत आहेत. शहरात महापालिका कर्मचाऱ्यांची पाच पथके तयार करण्यात आलेली आहेत. ही पथके प्रत्येक घरात जाऊन प्लॅस्टिक गोळा करणार, तसेच नागरिकांना प्लॅस्टिकमुक्तीची शपथ देऊन त्यांची नोंद करणार आहेत. प्रत्येक पथकाला 50 हजार घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
शहरात खासगी मोकळा भूखंड असलेला कचरा भूखंडमालकांना काढण्यास लावण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागात प्लॅस्टिक संकलन केंद्र उघडण्यात येणार आहे. बाजारपेठांतील रस्ते, शाळा व महाविद्यालयांतूनही ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 3 ऑक्टोबरनंतर प्लॅस्टिकवापरावर दंड करण्याची मोहीम अधिक कडक करण्यात येणार आहे. मात्र, मनपाने शहरातील कचऱ्याकडेही गांभिर्यांने लक्ष देण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.