कोल्हापूर – तामिळनाडूची निवडणूक एका टप्प्यात, उत्तर प्रदेशमध्येही एक टप्प्यात मतदान झाले. मग असे असताना महाराष्ट्रात इतक्या 5 टप्प्यांमध्ये मतदान घ्यायचे कारण काय ? याचा अर्थ असाच होतो की राज्यकर्त्यांना चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी पुन्हा-पुन्हा या राज्यात कसे येतील, याची काळजी घेण्यासाठी हे वेगळं टाईमटेबल पहायला मिळते, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रात 5 टप्प्यांत होणाऱ्या मतदानावरून निशाणा साधला. अधिक ठिकाणी संधी मिळावी म्हणून राज्यात एवढ्या टप्प्यात निवडणुकीचे मतदान घेण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली.
या मुद्दावरून खासदार संजय राऊत यांनी देखील निवडणूक आयोगावर निशाणा साधला. संजय राऊत म्हणले, मतदान झालेल्या दिवशीच मतदानाची टक्केवारी जाहीर होत असते. मात्र, यावेळी आयोगाकडून पहिल्या टप्प्यानंतर तब्बल अकरा दिवसांनी आणि दुसर्या टप्प्यातील मतदानानंतर तीन दिवसांनी मतदानाची टक्केवारी जाहीर करताना यामध्ये सहा ते सात टक्के अचानक वाढ झाली आहे. हा प्रकारच धक्कादायक असून नांदेडमध्ये ५२ टक्के मतदान झाले होते. त्यात अर्धा किंवा एक टक्का वाढ होउ शकते. मात्र, आता ६२ टक्के कसे होऊ शकते?, असा सवाल केला.
यामुळे वाढीव मतदान कोणाला झाले असा प्रश्न निर्माण होत असून आयोगाच्या कामकाजावर विश्वास कसा ठेवायचा हा गंभीर विषय आहे. डिजीटल इंडिया असे एकीकडे जाहीर केले जात असताना हा गोंधळ कुणाच्या सांगण्यावरून होतो हे कळायला हवे. मोदी-शहा यांच्या दबावाखाली आयोग काम करते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.