खालापूर, (वार्ताहर) – लग्न सोहळा असो की, अन्य कोणताही कार्यक्रम. या कार्यक्रमात जेवणावळी आल्याच. आता तर, बदलत्या काळात जेवणावळीचे स्वरुपही बदलत चालले आहे. पंगतीत बसून जेवण करण्याची प्रथा आता आजच्या धावपळीच्या युगात मागे पडून पंगतीची जागा आता बुफे पद्धतीने घेतली आहे. प्रगत समाजाची ओळख बनू पाहत असलेल्या या पद्धतीमुळे भुक नसली तरी ताटात भरभरून अन्नपदार्थ वाढून घेतले जात असून नंतर ते फेकून देण्याची पद्धत रूढ होताना दिसत आहे.
हल्ली जेवणावळीवर लोकांचा खूप भर दिसत आहे. पूर्वी अन्नदान करणे पुण्याचे काम म्हटले जायचे. उद्देश तोच असला तरी पद्धत बदलत आहे. पूर्वी जेवढे हेव, आहे तेवढे वाढले जायचे व पानातील सर्व अन्न संपवले जात होते. आता मात्र, पोटात भूक नसली तरी, ताटात वाढून घेतले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकणी कार्यक्रम आटोपल्यावर कार्यक्रम स्थळाच्या आजूबाजूला उष्ट्या अन्नाचे ढिग दिसून येतात.
एका लग्न समारंभाला सरासरी एक ते दोन हजार लोक हजर असतात. बुफे पद्धतीमुळे रांग लावून ताट वाढून घेण्याचा त्रास वाचविण्यासाठी अनेक जण ताटात गरजेपेक्षा जास्त अन्न वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही सर्व पदार्थ वाढून घेतले जातात. मात्र, आवश्यकतेपेक्षा ताटात जास्त अन्न घेतल्यामुळे ते वाया जाते. ताटातील अन्न फेकून देण्याची वेळ येते.
हे अन्न परिसरात टाकले जाते. त्यामुळे काही वेळाने त्याचा दुर्गंध पसरतो. अन्न हे पूर्णबह्म, असे आपल्या देशात मानले जाते. मात्र, याच देसात अनेकांना रात्री उपाशीपोटी झोपावे लागत आहे. गरीब व्यक्ती आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतो. त्याच देशात अन्न फेकुन दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे.