नवी दिल्ली- लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. मात्र सध्या पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे रोजी मतदान होणाऱ्या दोन जागांची जोरदार चर्चा सुरू आहे. अमेठी आणि रायबरेली या त्या दोन जागा.
येथील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या म्हणजे शुक्रवारी दुपारी तीन वाजता संपते आहे. भारतीय जनता पार्टीने या दोन्ही जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
मात्र कॉंग्रेसने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अमेठी आणि रायबरेली येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय आता पक्षाने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर सोपवला आहे.
या दोघांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवावी अशी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची इच्छा आहे. त्यांनी या दोन जागा लढवल्या नाहीत तर मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल असे खर्गे यांना वाटते.
तरीही आता येथून लढायचे की नाही याचा निर्णय गांधींवर सोपवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील वस्तूस्थितीची या दोघांना चांगली कल्पना असल्यामुळे ते योग्य निर्णय घेतील असे पक्षाला वाटते आहे.