श्रीनिवास पाटील, दीपक पवारांना मदत करा; भयमुक्त समाज घडण्यासाठी प्रयत्न करा
सातारा – सत्तेची आस आणि चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी अनेक जण कॉंग्रेसमधून पक्षांतर करत आहेत. सध्याचे सरकार महात्मा गांधींच्या तत्त्वांना काळिमा फासत आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असून भयमुक्त समाजाची निर्मितीचे महात्मा गांधींचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
जिल्हा कॉंग्रेस कमिटीमध्ये महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त बुधवारी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी खासदार श्रीनिवास पाटील, दीपक पवार, डॉ. इंद्रजित मोहिते, ऍड. राज कुलकर्णी, राजेंद्र शेलार, बाबुराव शिंदे, बाळासाहेब फाळके, बाबासाहेब कदम, श्रीनिवास थोरात, विराज शिंदे, विजयराव कणसे, सौ. रजनी पवार, डॉ. सुरेश जाधव, मनोहर शिंदे उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, सध्या सर्व यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. महत्त्वाच्या पदावर संघ विचारांच्या अधिकाऱ्यांना स्थान दिले जात आहे. डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना बदलणे, हेच भाजपचे धोरण आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील आणि सातारा विधानसभा मतदारसंघात दीपक पवार यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहावे. श्रीनिवास पाटील हे उद्या (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करणार असून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. प्रारंभी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.