नाणे मावळ (वार्ताहर) – नाणे मावळ परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या नाणे गावच्या हद्दीत ठिकठिकाणी कचरा उघड्यावर टाकला जात आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर प्रशाशनाच्या वतीने कोणत्याच स्वरूपाची कारवाई होत नाही. परिणामी रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नाणे मावळातील सर्व गावे स्वच्छ राहावे, यासाठी स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम राबविले जात असतात. असे असतानाही खेडे गावात विविध भागांत काही नागरिक कचरा थेट रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला फेकून देत आहेत. यामुळे नाणे मावळ विद्रूप होऊ लागले आहे. तसेच, आजुबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या भागातून ये-जा करताना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
सध्या उन्हाळा सुरू असून तापमानाचा पारा वाढला आहे. परिणामी रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा, त्यातील खाद्य पदार्थ लवकर खराब होत असून त्याची दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या परिसरातून ये-जा करणाऱयांना नाकाला रूमाल लावावा लागत आहे. तसेच दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱयांवर कारवाईची गरज आहे.
रस्त्याच्या कडेला ढीग
नाणे मावळातील काही रस्त्यांच्या कडेला कचऱयाचे ढीग साचले आहेत. त्यात प्लॅस्टिकच्या बाटल्या, शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ, खराब झालेल्या व न वापरात येणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने सर्रास हा कचरा रस्त्याच्या कडेला टाकून निघून जात आहेत. वर्षानुवर्षे हा कचरा त्याच ठिकाणी पडून राहत आहे. त्यामुळे हळूहळू या कचऱ्याचे ढीग तयार होऊ लागले आहेत.
या कचरा कुजून आजूबाजूच्या परिसरात याची दुर्गंधी पसरत असते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच ज्या ठिकाणी कचरा रस्त्यावर कचरा टाकला जात आहे, अशा ठिकाणी लक्ष देऊन दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.
विद्रुपीकरणावर भर
नाणे मावळ परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे. या परिसरात डोंगर, गड, किल्ले यामुळे पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. रस्त्याच्या कडेला कचरा टाकून गावे भकास केले जात आहे. मावळ परिसरात येणाऱया पर्यटकांचे त्यामुळे याकडे बघण्यचा दृष्टीकोन बदलू शकतो. त्यामुळे हा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी तसचे कचरा टाकणाऱयांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.