Voting time | Election Commission | Summer Weather : राज्यासह देशभरातील तापमानात प्रचंड वाढ होत आहे. कोणत्याही कामानिमित्त घराबाहेर पडताना नागरिकांना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इतकंच नव्हे तर या वाढत्या तापमानाचा मतदानावरही थेट परिणाम दिसून येत आहे.
वाढत्या उकाड्यामुळे मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत नसून मतदानाचा टक्का घसरला आहे. त्यामुळे मतदानाची वेळ बदलावी, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
लोकसभा निवडणूक 2024 चे दोन टप्प्यातील मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील कमी मतदानाने राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोग चिंतेत पडले आहेत.
यामागील मुख्य कारण उष्माघात आणि उष्णतेची लाट असल्याचे मानले जात आहे. येत्या काही दिवसांत कडक उन्हाचा तडाखा पाहता हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याचा इशारा लक्षात घेऊन काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मतदानाची वेळ वाढवण्याची मागणी केली आहे. हवामान खात्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लोकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
तेलंगणातील काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत वाढवण्याची विनंती केली. राज्यातील कडाक्याची उष्णता पाहता मतदानाची टक्केवारी कमी होऊ शकते. तेलंगणामध्ये 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात लोकसभेच्या 17 जागांसाठी मतदान होणार आहे.