पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, वाहतूक जनजागृती, कायद्याची कठोर अंमलबजावणी यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे. या प्रयत्नाला ‘प्रवास ४.०’सारखे कार्यक्रम पूरक आहेत, असे मत सह परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले.
बस अँड कार ओनर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया (बीओसीआय), पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड बस अँड कार ओनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाहतूक प्रदर्शन, पुस्तिका आणि ध्वनिचित्रफितीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड, अभिनेता देवदत्त नागे,
सहायक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, ‘बीओसीआय’चे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, चेअरमन जगदेव सिंह खालसा, महासचिव अल्लाह बक्ष अफजल, खजिनदार हर्ष कोटक, पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे, पिंपरी- चिंचवडचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे, संयोजक किरण देसाई, तुषार जगताप, बालकलाकार हर्षित देसाई यांसह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
प्रसन्न पटवर्धन म्हणाले, देशातील सर्वाधिक ८० टक्के प्रवासी वाहतूक सेवा देणारे आपले क्षेत्र आहे. येत्या काळात सार्वजनिक वाहतुकीला चांगले दिवस येतील, असा विश्वास आहे. हनुमंतराव गायकवाड म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात चांगली व सुरक्षित सेवा दिली, तर ग्राहक नेहमीच समाधानी असतो. देवदत्त नागे, जगदीश सिंह खालसा, राजन जुनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. मेघना एरंडे यांनी सूत्रसंचालन, तर किरण देसाई यांनी आभार मानले.
महामार्ग वाढले, तसा वाहनांचा वेगही वाढला. त्यातून होणारे अपघात रोखणे आव्हान असून, सार्वजनिक वाहतुकीवर अधिक भर दिला, तर वाहतूक कोंडी, प्रदूषण यावरही नियंत्रण आणता येईल. त्यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घेऊन येत्या काळात सार्वजनिक वाहतुकीला सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. स्मार्ट पोलिसिंग, आयटीएमएस प्रणाली अंमलात आणली जात आहे. जितेंद्र पाटील – सह परिवहन आयुक्त