अन् शेलारांचे एक मत वाढले
मतमोजणी पूर्ण होऊनही उशिरापर्यंत निकालाची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. त्यानंतर व्हीव्हीपॅटच्या सॅम्पल मोजणीत राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलार यांना एक मत वाढले, तर भाजपच्या पाचपुतेंचे एक मत कमी झाले. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास भाजपच्या बबनराव पाचपुते यांना अधिकृतपणे विजयी घोषित करण्यात आले.
श्रीगोंदा – मतमोजणीमध्ये अखेरपर्यंत काटे की टक्कर चाललेल्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात शेवटी भाजपच्या बबनराव पाचपुते यांनी निसटता विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार घनश्याम शेलार यांचा 4 हजार 749 मतांनी पराभव केला.
श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यालगतच्या शासकीय धान्य गोदामात गुरूवारी (दि.24) सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला.
श्रीगोंद्यात एकूण 3 लाख 10 हजार 357 मतदार होते. यापैकी 2 लाख 10 हजार 1 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण मतदानापैकी 67.66 टक्के मतदान झाले होते. श्रीगोंदा मतदारसंघात 344 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले होते. मतमोजणीच्या 25 फेऱ्या घेण्यात आल्या. प्रत्येक फेरीला 14 टेबलवर मतमोजणी करण्यात आली. श्रीगोंदा मतदारसंघात 11 उमेदवार नशीब आजमावत होते. परंतु भाजपचे पाचपुते आणि राष्ट्रवादीचे शेलार यांच्यातच मुख्य लढत होती. मतमोजणीमध्ये कधी पाचपुते तर कधी शेलार यांनी आघाडी मिळाली. शेवटच्या फेरीपर्यंत कोणत्याही उमेदवाराला निर्णायक मताधिक्य मिळत नव्हते. एखाद्या फेरीत पाचपुते पुढे जात तर एखाद्या फेरीत शेलार. त्यामुळे प्रत्येक फेरीनंतर श्रीगोंद्याचा आमदार कोण होणार? याबाबत उत्कंठा वाढतच गेली.
शेवटच्या फेरीपर्यंत कोणत्याही उमेदवाराचे मताधिक्य पाच हजारांच्यावर गेले नाही. बेलवंडी गटापर्यंत मोजणी झाली. त्यावेळी शेलार आघाडीवर होते. मात्र श्रीगोंदा शहरासह आढळगाव आणि काष्टी गटातील गावांमध्ये पाचपुते यांना मताधिक्य मिळाले. शेलारांची आघाडी कमी कमी होत जाऊन पाचपुतेंना आघाडी मिळाली.25 व्या शेवटच्या फेरीनंतर राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलार यांना 97 हजार 980 मते अधिक 528 पोस्टल मते असे एकूण 98 हजार 509 मते मिळाली. तर भाजपच्या बबनराव पाचपुते यांना 1 लाख 2 हजार 503 अधिक 755 पोस्टल मते अशी एकूण 1 लाख 3 हजार 257 मते मिळाली. शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत भाजपच्या बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलार यांच्यावर 4 हजार 750 मतांनी निसटता विजय मिळवला.
उमेदवार, पक्ष आणि त्यांना मिळालेली मते – घनश्याम प्रतापराव शेलार(राष्ट्रवादी)- 98, 508, बबनराव भिकाजी पाचपुते(भाजप) – 1,03,258(विजयी), सुनील लक्ष्मण ओहळ(बहुजन समाज पार्टी) – 1146, बाळू आप्पा जठार (भारतीय शेतकरी कामगार पक्ष) – 378, टिळक गोपीनाथ भोस (संभाजी ब्रिगेड) – 1186, नोटा – 1572
दरम्यान, मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे राहुल जगताप या नवख्या उमेदवाराने भाजपच्या बबनराव पाचपुते यांचा पराभव केला होता. यावेळी आ. जगताप यांनी कुकडी कारखान्याच्या कारभारावर लक्ष केंद्रित करण्याच्या कारणाने विधानसभा निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे राष्ट्रवादीने ऐनवेळी घनश्याम शेलार यांना उमेदवारी दिली. शेलार यांच्यामागे ताकद उभे करण्याचे काम आ. जगताप यांनी केले. तर नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन पाचपुते यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या लढतीत अखेर भाजपच्या बबनराव पाचपुतेंनी 4 हजार 750 मतांनी विजय मिळवला.