मुंबई – लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत असूनही मुख्यमंत्रीपदावर भाजप-शिवसेनेचे बिनसल्याने सत्ताकोंडी अद्यापही कायम आहे. तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांनी सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्याने राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली. यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना मिळून सत्तास्थापन करेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे.
शिवसेनेसोबत सरकार कधी स्थापन करत आहात या प्रश्नावर शरद पवार म्हणाले कि, महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल भाजप-शिवसेनेला विचारा. भाजप-शिवसेना वेगळे पक्ष आहेत. तसेच आमचे पक्षही वेगळ्या विचारधारेचे आहेत, असे त्यांनी सांगितले. शरद पवारांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, राज्यातील सत्ता स्थापनेच्या दृष्टीने सोनिया गांधी आणि शरद पवार यांची आज दिल्लीत बैठक होणार आहे. त्यानंतर महाशिवआघाडीचे चित्र स्पष्ट होणार आहे. अशातच शिवसेना रविवारी अखेर एनडीएमधून अधिकृतरित्या बाहेर पडली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.