बरेली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून प्रचार मोहीम सुरू केली. त्या यात्रेची समाप्ती लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी (४ जून) कॉंग्रेस ढुंढो यात्रेने होईल, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कॉंग्रेसच्या पराभवाचा दावा केला.
शहा यांनी भाजपच्या प्रचारासाठी गुरूवारी उत्तरप्रदेशात विविध सभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी प्रामुख्याने कॉंग्रेस आणि राहुल यांना लक्ष्य केले. मतदान झालेल्या पहिल्या दोन टप्प्यांत कॉंग्रेस कुठेच नाही.
त्याउलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४०० जागांच्या शर्यतीत शतक ठोकून आघाडी घेतली आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपची कामगिरी चांगली होण्याविषयी विश्वास व्यक्त केला. कॉंग्रेसचा मित्रपक्ष असणाऱ्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर शहा यांनी घराणेशाहीवरून टीकास्त्र सोडले.
अखिलेश आणि त्यांच्या कुटूंबातील ५ जण निवडणूक लढवत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. इंडिया आघाडीतील पक्षांचे नेते कुटूंबीयांच्या हितासाठी कार्यरत आहेत. कुणाला कुटूंबातील सदस्याला पंतप्रधान, तर कुणाला मुख्यमंत्री बनवायचे आहे. ते गरिबांच्या कल्याणाचा विचार करू शकतात का, असा सवाल शहा यांनी केला.