पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेची वाघोली, विमाननगर तसेच विमानतळाला पाणी पुरवठा करणारी जागतिक पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी सोमवारी दुपारी रावेत परिसरात फुटली. त्याचा फटका वाघोली, विमाननगर तसेच विमानतळाच्या पाणी पुरवठ्यावर झाल्याने महापालिकेला विमानतळाला गेल्या दोन दिवसांपासून टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे.
दरम्यान, ही जलवाहीनी दुरूस्त करण्यात आली असून गुरूवार दुपारपासून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केला आहे.
जागतिक बॅंकेच्या निधीतून वाघोली परिसर, विमाननगर तसेच विमानतळाला पाणी पुरवठा करण्यासाठी १००० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी मंगळवारी दुपारनंतर औंध-रावेत बीआरटी मार्गाच्या परिसरात फुटली. मात्र, दिवसभर वाहतूक असल्याने पालिकेकडून रात्री उशीरा दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले, त्यानंतर गुरूवारी पहाटे हे काम पूर्ण झाले. ही जलवाहिनी जुनी असल्याने सातत्याने ती फुटत असते.
विमानतळाची तहान टॅंकरवर…
जलवाहिनी फुटल्याने विमानतळाचा पाणी पुरवठाही विस्कळीत झाला. त्यातच, सुट्टयाचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असल्याने महापालिकेकडून गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात टॅंकरद्वारे पाणी दिले जात असल्याचे नंदकिशोर जगताप यांनी स्पष्ट केले. तसेच वाघोली आणि विमाननगर भागातही टॅंकरची संख्या वाढविण्यात आली असून आजपासून पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचा दावा जगताप यांंनी केला आहे.