पारनेर – मला तुम्ही आत्ता पाच दिवस द्या, मी तुमची पुढील पाच वर्षे सेवा करण्यासाठी बांधील राहिल. जनतेच्या जीवावरच माझे समाजकारण राजकारण चालू असल्याने त्यांची कामे करताना मला ऊर्जा मिळते, त्यामुळे जनता हेच माझे खरे टॉनिक असून सामान्य जनता हे माझे दैवत आहे.
विधानसभेची माझी निवडणूक सामान्य जनतेनेच हातात घेतली आहे. या निवडणुकीत बदल हा होणारच असा दावा करीत अभी नही तो कभी नही असा नारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे व आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी दिला आहे.
जवळे (ता. पारनेर) येथील धर्मनाथ मंदिरात नारळ वाढवून निलेश लंके यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बसस्थानक परिसरात आयोजित सभेत ते बोलत होते.सभापती प्रशांत गायकवाड, अशोक सावंत, माजी पंचायत समिती सदस्य किसनराव रासकर, माजी सरपंच सुभाष आढाव, डॉ. आबासाहेब खोडदे, बाळासाहेब दिघे, गोरख आढाव, ऍड. बाळासाहेब लामखडे, सुभाष खोसे, संपतराव आढाव, वसंतराव मोरे, भाऊसाहेब लटांबळे, अण्णासाहेब बढे, बाळासाहेब खोसे आदी मान्यवर उपस्थित होते.
लंके म्हणाले, पारनेरची निवडणुक ही पुढाऱ्यांच्या हातात राहिली नसून ती सामान्य जनतेने हाती घेतली आहे. मी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या अडचणी समजावून घेतल्या आहेत. त्यामध्ये बेरोजगारी, पाणी व शेतीमालाचे बाजारभाव सर्वसामान्य लोकांच्या समस्या प्रामुख्याने समोर आल्या.
या मतदारसंघात सर्पदंशाने 495 लोकांना जीव गमवावा लागला हाच पारनेरचा विकास का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधी हे स्वत:ला विकासपुरुष समजतात. सामान्य जनतेला वेठीस धरून अनेक वर्ष तालुक्यातील जनतेचा अपमान या लोकप्रतिनिधींनी केला, अशा लोकप्रतिनिधींना आता घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आलेली आहे असे लंके यावेळी बोलताना म्हणाले.
ठराव दाखल करणारे सत्तेतून रन आऊट होणार
बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर दाखल झालेल्या अविश्वास ठराव बाबत बोलताना लंके म्हणाले की, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. ठराव जरी दाखल झाला असला तरी 25 ला त्याची सभा होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी ज्यांनी अविश्वास ठराव दाखल करण्यास भाग पाडले ते सर्वजण सत्तेतून रन-आऊट होणार आहे.