सचिन खोत
हर्षवर्धन पाटलांची सहानभूती, दबावतंत्र कामी येणार : राष्ट्रवादीकडून उलटा कांगावा
पुणे – गेल्या चार महिन्यांपूर्वी गुण्यागोविंदाने नांदणारी आघाडी आता इंदापूर तालुक्यात फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. त्याचा परिणाम इंदापूरच्या राजकीय पटलावर उमटले आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत हायकमांडचा आदेश मानून खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला. त्यावेळी उमेदवारीचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर विधानसभेचा प्रश्न मार्गी लागणार असे दिसत होते.
मात्र, कॉंग्रेस- राष्ट्रवादीमधील इंदापूरच्या जागेवरून तिढा सुटलेला नाही. त्यामुळे पाटील यांचा गेल्या वीस वर्षांतील राष्ट्रवादीचा लेखाजोखा मांडत सहानभूती मिळवित आहे. यातून दबावतंत्र वाढविल्यामुळे इंदापूरच्या जागेवरून आघाडीत पेच निर्माण झाला आहे. पाटील यांनी राष्ट्रवादीला केलेली मदत आणि परतफेड करताना त्यांना डावलल्याची सल कार्यकर्त्यांच्या मनात आहे. याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या पाच वर्षांपासून सत्तेच्या परीघाबाहेर असलेल्या माजी मंत्री पाटील यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी गावपातळीपर्यंत संघटन, कार्यकर्त्यांची फळी उभारली आहे. त्याचा परिणाम गावपातळीपासून ते तालुकापातळीपर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये दिसून आला. त्यामुळे पाच वर्षांत पाटील यांनी सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, नगर पालिका यांच्यावर पुन्हा पकड मजबूत केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत घटलेला जनाधार मिळविला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांच्या पदरी अपयश आले. 20 वर्षांपासून मंत्रीपद असल्यामुळे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद कमी होत गेला.
त्यामुळे त्यांच्या संवादातील दरी पराभवास कारणीभूत ठरली. या अपयशातून बोध घेत हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा नेटाने कामास सुरूवात केली. तसेच आघाडीतील महत्वाचा साथीदार असलेल्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत साथ दिली. विधानसभेच्या निवडणुकीतील जागा वाटपाची बोली पाटील यांच्या बाजूने झुकल्यामुळे त्यांनी खासदार सुळे यांचा प्रचार केला. सुळे यांना मताधिक्य मिळाल्यामुळे पाटील यांची “क्रेझ’ वाढली.
विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तशी पाटील यांचा संयम ढळत आहे. त्यात पाटील यांची भाजप आणि शिवसेनेशी जवळीक आहे. त्यामुळे आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यास पाटील हे शिवसेनेच्या तंबूत सामील होतील, अशी शक्यता आहे.
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील राजकीय वारे जोरात वाहू लागले आहे. त्यात आघाडीचे इंदापूरवर एकमत झाले नाही. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी राष्ट्रवादीकडून गेल्या वीस वर्षांत पाचवेळा मदत केलेला पाढा कार्यकर्त्यांसमोर वाचून दाखवित आहे. त्यामुळे पाटील यांना सहानुभूमी आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळणार आहे. यातून पाटील यांनी फारकत घेतली तर आघाडीला त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जागा वाटपापूर्वी विरोधात बोलत आहेत, असा कांगावा करीत आहेत. राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर हर्षवर्धन पाटील यांना बळ देणारे ठरणार आहे. त्यामुळे हात दाखवून अवलक्षण ओढवून घेण्याची वेळ राष्ट्रवादीवर येण्यास फारसा वेळ लागणार नाही.
आघाडीची हक्काची जागा धोक्यात
इंदापूरच्या जागेचा तिढा आणि दुसरीकडे विद्यमान आमदारांचे पक्षांतर यामुळे आघाडी बॅकफूटवर आली आहे. मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जागा वाटप लोंबकळले आहे. हा प्रश्न लवकर सोडविला नाही तर आघाडीच्या कोट्यातील हक्काची आणि विजयासमीप पोहचणारी इंदापूरची जागा धोक्यात येण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहे. यावर आता येत्या आठवड्यात तोडगा निघण्याची शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी पाटील हे दोन्ही डगरीवर पाय ठेऊन आहेत.