पिंपरी – तळेगाव एमआयडीसीत 2 लाख कोटींचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प साकारून 2 लाख तरुणांना नोकरी व्यवसाय उपलब्ध होणारा उद्योग परराज्यात नेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे थाटामाटात उद्घाटन झाले. मेट्रोचे काम अर्ध्यावर थांबले आहे. ते का थांबले? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी पिंपळे निलख येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, सुनिल शेळके, उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, शहराध्यक्षा कविता आल्हाट, ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, कॉंग्रसेचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे आदी यावेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, मध्यंतरी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. कॉंग्रसेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला. हे पाहून कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचे दिसत आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप वाढत चालल्यामुळे कोयता गॅंग डोके वर करु पाहात आहे. मी गृहमंत्री असताना गुन्हेगारांची हिम्मत होत नव्हती. कारण, त्यावेळी माझा कार्यकर्ता जरी चुकीचा वागला तरी त्याच्यावर कारवाई करण्याची सूचना संबंधित पोलिस अधिका-यांना मी करायचो. एवढ्या निष्पक्ष पध्दतीने काम सध्या होताना दिसत नाही.
पालकमंत्री काहीही बरळत सुटले आहेत. कधी म्हणतात महात्मा गांधी वरुन खाली येणार आहेत. तर कधी महापुरुषांनी भीक मागून शिक्षण शिकवले. पालकमंत्र्यांनी एका जबाबदार व्यक्तीप्रमाणे वागावे. तुम्ही गेली आठ महिने सत्तेत आहात. लोकांचे प्रश्न का सुटत नाहीत? मेट्रोचे काम का थांबले आहे ? काय अडचण आहे? यांच्या अंगातच दम नाही. हे कधी विकास कामात दम दाखवणार? गेल्या 32 वर्षांपासून सर्वांना सोबत घेऊन विकास कामे केली आहेत. असे काम सध्याचे राज्यकर्ते करत नसल्याचे आपण पाहात आहात.
आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. येत्या 26 तारखेला भावनेच्या आहारी न जाता नाना काटे यांच्या नावापुढील बटन दाबून आशिर्वाद द्या, अशी विनंतीही पवार यांनी मतदारांना केली. अजित पवार म्हणाले, आज अण्णा बनसोडे एकटे आमदार आहेत. त्यांच्या जोडीला नाना आल्यानंतर दोघांकडून कामे करुन घेण्याची जबाबदारी माझी राहील, हा माझा तुम्हाला शब्द आहे. मी रोखठोक स्वभावाचा आहे. जे बोलतो ते करतोच. 2017 ची वेळ वगळता चिंचवडकरांनी मला नेहमीच साथ दिली आहे. झाले गेले विसरुन जाऊन आता तरी साथ द्या. आपल्याला कामाचं वेड आहे. समाजाचे काम करण्यासाठी झपाटलेला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी महाविकास आघाडी कदापी तडजोड करणार नाही. कितीही संकटे येऊ देत, त्यापुढे महाराष्ट्र कदापि झुकला नाही. आव्हानांशी महाराष्ट्र लढत राहिला आहे. चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, अशी विनंती पवार यांनी केली आहे.