Sanjay Raut| महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सासवडमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी संजय राऊत यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. देशाचे पंतप्रधान गेल्या 10 वर्षांपासून रोज खोटं बोलतात. इतकं खोट बोलणारा पंतप्रधान देशाने पाहिला नव्हता, असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“देशाचे पंतप्रधान गेल्या 10 वर्षांपासून रोज खोटं बोलतात. इतकं खोट बोलणारा पंतप्रधान देशाने पाहिला नव्हता. महाराष्ट्रातील स्वाभिमानी पक्ष फोडायचे आणि लूट गुजरातला नेणे, हा उद्योग मोदी आणि शाह यांनी चालवला आहे. पंतप्रधान मोदी एका महिन्यात 27 वेळा महाराष्ट्रात आले. कारण महाराष्ट्र दिल्ली उठवून टाकेल, अशी त्यांना भीती वाटत आहे.”
“उद्धव ठाकरेंनी औरंगजेबासारखा काँग्रेसचा हात पकडला आहे. नरेंद्र मोदी तुम्ही स्वत: औरंगजेब आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे.औरंगजेबाचा जन्म गुजरातला झाला होता. महाराष्ट्रावर चाल करुन येणारी व्यक्ती पंतप्रधान असली तरी आम्ही त्यांचा मान ठेवणार नाही. मोदी प्रचारसभेत खोटं बोलतात. त्यांनी मुस्लीम बांधवांविषयी बोलणे शोभते का?,” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
“ज्यांनी घरातील मंगळसूत्राचा मान ठेवला नाही, त्यांनी मंगळसूत्राबात बोलू नये. देशातील हुकूमशाही उलथवून टाकली पाहिजे. शरद पवारांचा पराभव करण्यासाठी भाजपने त्यांचं घर फोडलं. मराठी अस्मितेचं रक्षण करणारा शिवसेना पक्ष फोडला. पण त्यामुळे काय वाकडं झालं? आजही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्त्वात आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
4 जूननंतर जनताच तुम्हाला बघून घेईल
अजित पवार हे अनेक मतदारसंघांमध्ये आपल्या भाषणांमध्ये व्यापाऱ्यांना धमक्या देतात. या व्यापाऱ्यांवर कोट्यवधींचा दंड लादला जातो. हा दंड मागे घ्यायचा असेल तर आमच्यासोबत या, आमचं काम करा, असे अजित पवार सांगतात. पण 4 जूननंतर जनताच तुम्हाला बघून घेईल. अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मैदानात उतरुन निवडणूक लढवावी. आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. अजित पवार म्हणतात, मी विकास केला. शरद पवार साहेबांनी बारामतीत हे सर्व निर्माण केलं नसतं तर तुम्ही अजूनही बारामतीमध्ये राजदूत मोटारसायकलवरुन दूधच विकत बसला असतात,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
शरद पवार तुमचा अजुनही दरारा
“बारामतीची लढाई सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांची नाही. बारामतीची लढाई महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे. आमच्या पराभवासाठी बारामतीमध्ये ठाण मांडून बसणार. पण आले किती गेले किती भरारा शरद पवार तुमचा अजुनही दरारा, तुम्ही काय आम्हाला संपवणार?” असे म्हणत संजय राऊत यांनी महायुती वर निशाणा साधला.
हेही वाचा: