वि ख्यात विडंबनकार, नाटककार, व्यंग-चित्रकार, पत्रकार, तपस्वी प्रबोधनकार, अध्यापक रंजन खरोटे आबा हे चालता बोलता सोडून गेले.द्वेषाधीश, दोषाधीश खूप असतात. पण एवढे असंख्य गुण एकवटलेला माणूस दुर्मिळ असतो. 1974 मध्ये प्राचार्य पी. बी. सांगळे यांच्या पारखी निर्णयामुळे खरोटे सर, मी, सी. के. मिस्तरी कालिका विद्याप्रसारक संस्था, शिरुड संस्थेत लागलो.
स्नेहाच्या वीणेमुळे मैत्री घट्ट झाली. खरोटे सरांची व माझी नाटकं, एकांकिका रंगमंचावर प्रस्तुत झाल्या. रंग-तरंग कलापथक खूप गाजले. सी. के. मिस्तरीच्या सुमधूर आवाजाचा शोध लागला. हा आवाज आजही शाबूत आहे! आबांच्या जाण्याने संगीत क्षेत्रातल्या पी. एस. आप्पा वाणी, भास्कर देवरे, सुरेश देवांग वाल्मिक महाराज, गोकूळ कासार इ. अनेकांची आठवण उजळून निघाली.
प्रेरणा उत्तेजना देणारा शिक्षक विद्यार्थ्याचं जीवण घडवतो. अफाट ऊर्जा देत असतो. खरोटे सर मराठी-हिन्दीचे निष्णात अध्यापक होते. त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या. अंधश्रद्धा निर्मूलनाचे “बाबा घेतो ताबा’ चे अनेक प्रयोग करून ते लोकशिक्षक, जनाध्यापक झाले होते! ते आपल्याजवळ असलेली गुणवत्तेची सत्त्वशील शिदोरी उदार मनाने वाटत राहिले. ते चैतन्ययात्री होते. त्यांच्या उपस्थितीने मरगळ नष्ट व्हायची.
खरोटे अभिनेते-दिग्दर्शकही होते. एक प्रसंग आठवतो. गोंदेगाव ता. सोयगाव जि. औरंगाबाद येथे मी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या “चुडेदान’ या तीन अंकी नाटकाचा प्रयोग व्हायचा होता. सरस्वती भुवन हायस्कूलचे आम्ही माजी विद्यार्थी हा नाट्यप्रयोग सादर करणार होतो. त्यातील “सुहास’ या खलनायकाची भूमिका करणारे कलावंत दूर नोकरीला असल्याने येऊ शकले नाहीत. नाटक सत्य घटनेवर आधारित असल्याने अफाट गर्दी लोटेल हे माहीत होतं. खरोटे स्वत:च म्हणाले, काळजी करू नका, मी पात्र उभं करून नाटक यशस्वी करीन. त्यांनी केवळ प्रॉम्टिंगवर खलनायक असा उभा केला की, प्रेक्षकांना काही कळलं नाही. त्यांची अभिनयक्षमता सिद्ध झाली! असे मुरब्बी कसलेले अभिनेते होते खरोटे! नंतर या नाटकाचे बरेच प्रयोगही झाले. ते सिनेमाकडेही वळले. बुद्धीप्रामाण्य असल्याशिवाय, कर्मकांड नाकारल्याशिवाय अंधश्रद्धेवर हल्लाबोल करता येत नाही! ते प्रखर विज्ञानवादी होते. नेत्रदान, देहदान, अवयवदान करायला माणूस निर्भय, भक्कम दृढ विचारांचा असावा लागतो. प्रबोधनकार ठाकरे साहेबांच्या-
धर्मावाचून प्राण न जाई,
देवाविन नच अडते
आत्मशक्ती खंबीर तयांच्या
त्रिभूवन पाया पडते
या धाडसी ओळी अक्षरश: जगून दाखवल्या! या ओळी झणझणीत अंजन घालणाऱ्या आहेत. पचायला जड आहेत. त्यांनी अंधश्रद्धेत जखडलेल्या झापडनंद शिक्षितांना ठणकावत जागवलं! भंपक भोंदू बाबांना उघडं पाडलं! सरांनी तानाजी शिंदे नावाचा एक दमदार वारसदार तयार करून ठेवलाय. तो स्वतंत्र कार्यक्रम सादर करतो. खरोटे सरांची व्यंगचित्रे खूप धारदार झाली होती. सत्तालंपट सत्ताधाऱ्यांच्या बरगड्या ते आपल्या कुंचल्यातून मोडून टाकायचे, घणाघात कराये.
व्यंगचित्रांच्या धनुष्याने
मस्तवाल वाकवता येतो
निशाणा लागला की
उर्मठ झुकवता येतो!
एवढे सामर्थ्य कुंचल्यात होते. ते गीतकार होते, गायक होते. एवढे गुण असूनही हा माणूस कमालीचा विनयशील होता, बोलणं, हितगुज करणं त्यांना आवडायचं. जगदीश देवपुरकर, रावसाहेब गरुड, रामदास वाघ, जगतराव सोनवणे, राधेशाम वर्मा, कॉ. मनोहर पाटील, प्राचार्य जे. जी. खैरनार, नथ्थुभाऊ गुजर, आत्माराम बापू पाटील, दीपक निकम, प्रभाकर गुरव इ. अनेक दिग्गज लोकांशी त्यांचा निकटचा स्नेह होता. धुळे जिल्हा ही त्यांची वंदनीय ऊर्जाभूमी होती. “बेबंदशाहीचा बेबंद बादशहा’ हे त्यांचे खळखळून हसवणारे स्त्री पात्र विरहीत वगनाट्य. जगदीश देवपूरकरांनी त्याचे काही प्रयोग केले. त्यांनी एकांकिकाही लिहिल्या. विनोद आणि प्रखर विज्ञानवादी विचारांचा समन्वय त्यांच्या व्यक्तित्वात होता. जीवन म्हणजे अनंत आव्हानं, प्रदीर्घ साहस आणि पात्रतेची कसोटी!, असे प्रेरक विचारही खरोटे यांनी “ज्ञान-धन’ या आपल्या पुस्तकातून दिले आहेत. त्यांनी लिहिलेली गीतेही खूप चर्चित झाली. वैभवी शब्दांची श्रीमंती ते सर्जनाच्या रथातून मिरवित राहिले! अक्षरांच्या डोळ्यांनीच त्यांनी या समाजातील नागडे सत्य पाहिले!
उच्चभ्रू अभिजनवर्गाने अशा गुणवंत माणसाची दखल का घेतली नाही? हे वास्तव असलं तरी त्यांनी याची कधीच खंत बाळगली नाही. कथाकथनही ते उच्च दर्जाचे करायचे. श्रोत्यांना जागेवरच खिळवून ठेवायचे! त्यांचे अप्रकाशित लेखन समोर येण्यासाठी प्रयास करावा लागेल. रजनी वहिनी गेल्यानंतर ते खूप हादरले होते. त्यावर त्यांनी अंगभूत क्षमतेने मात केली. लेखनात गुंतवून घेतलं. कवी विनय मिराशे म्हणतात,
जीवन म्हणजे श्वासासंगे इमान असते राजा,
आचाराची-विचाराशी कमान असते राजा!
यातील मर्म समर्थपणे आबांनी पेललं खान्देशी मातीतील या मौल्यवान मोतीला विनम्र अभिवादन!
– डी. बी. जगत्पुरिया