पुणे – लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीची वज्रमूठ अधिक घट्ट झाली आहे. सर्वजण एकदिलाने काम करीत आहेत. यापुढील काळात सर्वांना सोबत घेवून बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केले.
सुनेत्रा पवार यांनी (दि.२७) खडकवासला मतदारसंघातील वारजे, बावधन आणि कोथरुड भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी भेट देत नागरीकांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, दिलीप बराटे, प्रमोद हिंदुराव, बाबा धुमाळ, राजाभाऊ बराटे, किरण दगडे पाटील, ॲड. मंदार जोशी, मिलिंद वालवडकर, दिलीप वेडे पाटील, गणेश वरपे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, शंकर केमसे, सागर कडू, सुरेंद्र कंधारे, सूर्यकांत भुंडे, अर्चिता जोशी, किर्ती पानसरे, अर्चना चंदनशिवे, शैलेश वेडे पाटील, वैभव मुरकुटे, शंतनू नारके आदी मान्यवर सहभागी झाले होते.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रत्येक भागात फिरताना काही ना काही समस्या आहेतच. या समस्यांचा मी आढावा घेवून त्या सोडवण्यावर माझा भर असणार आहेत. त्याचवेळी सर्वांना सोबत घेवून बारामती लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.
त्या म्हणाल्या की, सर्वांनाच अजित पवार यांच्या कामाची पद्धत माहिती आहे. अजित पवार हे जे काम हाती घेतात ते पूर्णत्वासच नेतात. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या सर्व समस्यांचा निपटारा होईल, याबद्दल कोणीही मनात शंका बाळगू नये, असेही सुनेत्रा पवार यांनी यावेळी नमूद केले.
आमदार भीमराव तापकीर म्हणाले की, देशाचे नेतृत्व कोणाची हाती द्यायचं, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन करावे अशा सूचना यांनी यावेळी केले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी प्रचार दौऱ्यात विविध सोसायट्यांनाही भेटी दिल्या. ठिकठिकाणी सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.