मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगावमधल्या पाचोरा येथे सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून, केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. भाजपाकडून सातत्याने होणाऱ्या घराणेशाहीवरील टीकेलाही उत्तर दिले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांचा फकीर म्हणून उल्लेख करत हल्लबोल केला आहे.
सभेला संबोधित करत उद्धव ठाकरे यांनी, “माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, हे लोक माझ्यावर आरोप करतात की मी घरी बसून सरकार चालवलं. पण मी घरी बसून जे केलं ते तुम्ही वणवण फिरूनही करू शकला नाहीत हे कबूल करा. मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळत होतो म्हणून ही जनता इथे आली आहे. हे लोक घराणेशाहीबद्दल बोलतात, परंतु घराणेशाहीला एक परंपरा असते. तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं? ते म्हणतात ना, मी फकीर आहे, मग झोळी लटकवून निघून जाशील, पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं. पंतप्रधानांवर सडकून टीका केली.
पुढे बोलताना त्यांनी “राहुल गांधींनी प्रश्न विचारला आहे, तो प्रश्न त्यांना एकट्याल्याच पडला नाही, तर जनतेला आणि शेतकऱ्यालाही पडला आहे. शेतकऱ्याला प्रश्न पडलाय की, मी मरमर मरतोय पण माझं कर्ज काही फिटत नाही, परंतु पंतप्रधानांचा मित्र गेल्या ५ ते १० वर्षात जगातला दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात श्रीमंत व्यक्ती कसा बनला? खरंच तो इतका यशस्वी झाला का? तसं असेल तर त्याची यशोगाथा काढा आणि द्या ती शेतकऱ्याला, कसं व्हायचं श्रीमंत हे सांगा त्यांना. असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “सत्यपाल मलिक यांनी पुलवामाबद्दल माहिती दिली. ‘पुलवामाच्या घटनेत ४० सैनिक शहीद झाले. ही पूर्ण चूक गृहमंत्रालयाची होती,’ असं सत्यपाल मलिकांनी सांगितलं. भ्रष्टाचार, काश्मीरचे ३७० कलम हटवण्याबद्दल सत्यपाल मलिक बोलले. पण, उत्तर देणं लांब राहिलं, सत्यपाल मलिकांच्या मागे सीबीआय लावली आहे.” असा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.