मुंबई – त्यांना शिवसेना, बाळासाहेब, धनुष्यबाण, बाळासाहेब ठाकरेंचे विचार नको, त्यांना फक्त पैसे पाहिजेत. म्हणूनच त्यांनी शिवसेनेच्या खात्यातील जनतेचे आणि शिवसैनिकांचे 50 कोटी रुपये रुपये काढून घेतले, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच, महाविकास आघाडीमध्ये सावळा गोंधळ आहेच, पण शिवसेना ठाकरे गटात पण सावळा गोंधळ असल्याचे म्हणत त्यांनी निशाणा साधला.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विविध पक्षातून अनेक नेते पक्षप्रवेश करत आहेत. त्यानुसार आजही शिवसेनेत अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशापूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
राज्य सरकारचे सुरू असलेले काम अतिशय उत्तमरित्या सुरू आहे. त्यामुळे सर्वजण शिवसेनेत येत आहेत. शिवसेना पक्षाचे कामही योग्य पद्धतीने सुरू असल्यामुळे सर्वजण सोबत येत आहेत. यामध्ये एवढंच आहे की, या सर्व लोकांना ठाकरे गटात मिळणारी वागणूक आणि शिवसेनेत मिळणारी वागणूक कारणीभूत ठरत आहेत. विकास हाच आमचा अजेंडा आहे. मागील दोन वर्षांत आम्ही केलेल काम समोर आहे. 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कामही समोर असून, लोकं प्रभावित होत आहेत आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे ते म्हणाले.
ज्यांना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचे विचार पटतात, ते सगळे सोबत येत आहेत. आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पण तिकडे (उबाठा) मालक-नोकराप्रमाणे वागवत होते. बाळासाहेब ठाकरे सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. पण आता आहेत ते सहकाऱ्यांना घरगडी समजतात. हाच फरक आहे, अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंवर टीका केली.