पुणे -कोकणावर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. स्वच्छ, निळाशार समुद्र, मनमोहक आणि हिरवाईने नटलेला परिसर नेहमीच पर्यटकांना खुणावत असतो. आता गोव्याच्या धर्तीवर कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरही प्रायोगिक तत्त्वावर झावळीच्या झोपड्यांची (बीच शॅक) बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाला तर चालना मिळणार आहे.
गोव्यातील किनाऱ्याप्रमाणेच कोकणातील किनारपट्टीवरही आता “शॅक्स’च्या रांगा आणि खाद्यपदार्थांची रेलचेल बघायला मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन मंडळाने हिरवा कंदील दिला आहे. यामुळे कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर झावळीच्या झोपड्यांमध्ये (बीच शॅक) आरामखुर्चीवर निवांत बसून खाता-पिता येणार आहे. कोकण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने (एमटीडीसी) करोना काळापूर्वी “बीच शॅक’ पॉलिसी जाहीर केली होती. आता त्याची अंमलबजावणी होणार आहे.
“शॅक’साठी “एमटीडीसी’कडून परवाना बंधनकारक असून, यासाठी व्यावसायिकांना अनेक नियमांची पूर्तता करावी लागणार आहे. परदेशी लोकांना “शॅक’चा परवाना आणि तिथे काम करता येणार नाही. या “शॅक”ची रचना कशी असावी, स्वच्छतागृहे, आपत्कालीन व्यवस्थेबद्दल या पॉलिसीमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. प्रत्येक “शॅक’मध्ये सीसीटीव्ही बंधनकारक असतील.
काय आहे या नियमावलीमध्ये?
बांबू, झावळ्या असे पर्यावरणपूरक साहित्य वापरणे बंधनकारक
सिमेंट-क्रॉंक्रिटच्या बांधकामावर बंदी
प्रत्येक “शॅक’मध्ये आपत्कालीन परिस्थितीशी अनुसरून अत्यावश्यक सेवा.
प्रत्येक “शॅक’ची स्वतंत्र पोर्टेबल टॉयलेट, मैलापाण्याची विल्हेवाट बंधनकारक
किनाऱ्यावर धूम्रपान आणि तंबाखू सेवनास बंदीचा फलक लावणे सक्तीचे.
“शॅक’मध्ये अंमलीपदार्थ आढळल्यास परवाना तत्काळ रद्द करणार
पर्यावरण जपणे आवश्यक
या साऱ्या बाबी असल्यातरी कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर हजारोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षीही येतात. तसेच शंख, शिंपले आणि समुद्री जैवविविधतेने हे किनारे नटलेले आहेत. त्यामुळे बीच शॅक्स ही संकल्पना राबवताना याबाबतची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे.
जिल्हा आणि “शॅक’ उभारले जाणारे किनारे
सधुदुर्ग
तारकर्ली, कुणकेश्वर
रत्नागिरी
आरे-वारे, गुहागर
रायगडदिवेआगार, वर्सेली
पालघर
बोर्डी, केळवा