Uddhav Thackeray | Sharad Pawar | Narendra Modi : एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या महामुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अनेक मुद्यांसह महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की,
“शरद पवार हे या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार असा खोचक सवाल त्यांनी केला. त्यांच्या या विधानाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. विरोधकांनी त्यांच्या या विधानाची निंदा करत मोदींवर हल्ला चढवला.
पुढे मोदी म्हणाले, ‘बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कधीच विसरू शकत नाही. माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला.
तसंच उद्धव ठाकरे अडचणीत असतील तर त्यांना मदत करणारी पहिली व्यक्ती मीच असेन, असं वक्तव्यही मोदी यांनी केलं. मात्र त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
दरम्यान, आता उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या या विधानावर स्वतः शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘नरेंद्र मोदींनी लाख काहीही म्हटलं तरी आमची प्रार्थना असेल की, उद्धव ठाकरेंना यांची मदत घेण्याची वेळ येऊ नये,’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
मोदींच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘कुटुंब सांभाळता आलं नाही ते महाराष्ट्र काय संभाळणार?’ अशी टीका नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केली होती.
आता या टिकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मोदींनी कुठे कुटुंब सांभाळलं? मी त्यावर जाऊ इच्छित नाही. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक आहे. पण आपण व्यक्तीगत बोलणार नाही”, असं शरद पवार म्हणाले.