Amethi | Raibare | Priyanka Gandhi । Lok Sabha Election । काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी रायबरेली आणि अमेठीमध्ये कॉंग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळणार असून त्या पुढील काही दिवस याच लोकसभा मतदार संघांमध्ये तळ ठोकणार असल्याची माहितीपक्षाच्या सूत्रांनी दिली.
यावेळी राहुल गांधी हे रायबरेलीतून तर अमेठीतून गांधी घराण्याशी जवळीक असलेले किशोरीलाल शर्मा हे निवडणूक लढवत आहेत. किशोरीलाल शर्मा यांच्या प्रचारासाठी प्रियंकांना तिकडे जादा वेळ तर द्यावाच लागेल पण राहुल गांधी हे देशभर प्रचारासाठी व्यस्त असल्याने रायबरेलीतही त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.
प्रियंका गांधी यांनी याआधीच प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून सोमवारपासून मतदान संपेपर्यंत त्या रायबरेली आणि अमेठीमध्ये तळ ठोकून राहतील असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले.
काँग्रेसने रायबरेलीमधून मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचा संकल्प केला आहे आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता त्यामुळे अमेठी मतदार संघ देखील परत मिळवण्याचा संकल्प कॉंग्रेसने केला आहे.
अमेठीत प्रियंका गांधी या स्वता लढणे अपेक्षित असताना कॉंग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना तेथून का उतरवण्यात आले, याचे स्पष्टीकरण कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिले आहे.
त्यांनी म्हटले आहे आपण राहुल गांधी यांच्या विरोधात लढत आहेात हे एकमेव भांडवल स्मृती इराणी या करीत होत्या. पण आता तेथे राहुल गांधी हे रिंगणात नसल्याने स्मृती इराणी यांचे हे मूळ भांडवलच नाहीसे झाले आहे असे त्यांनी म्हटले आहे.
काही विश्लेषकांच्या मते गांधी घराण्याशी संबंधीत साधी व्यक्तीही स्मृती इराणींचा पराभव करू शकते असे मेसेजही देण्याचा प्रयत्न या निमीत्ताने कॉंग्रेसने केला आहे.
आपल्या अमेठी आणि रायबरेलीतील प्रचारांत प्रियंका गांधी अनेक ‘नुक्कड सभा’, आणि घरोघरी प्रचार कार्यक्रमावर भर देणार आहेत. रायबरेलीत त्यांचा मुक्काम एका गेस्ट हाऊसवर असेल आणि त्या मतदान केंद्राच्या व्यवस्थापनापासून लोकांपर्यंत पोहचण्याच्या प्रचारातही वयैक्तिक लक्ष घालणार आहेत असे संबंधीत सूत्रांनी सांगितले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांशी आणि ज्यांचे गांधी कुटुंबाशी अनेक दशकांपासून कौटुंबिक संबंध आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणे सुरू झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्या दोन मतदारसंघातील डिजिटल आणि सोशल मीडिया प्रचारावरही लक्ष ठेवतील, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट या प्रमुख नेत्यांच्या प्रचाराचे नियोजन आणि वेळापत्रकही प्रियंका गांधी सांभाळतील.
कॉंग्रेसने केलेल्या नियोजनानुसार प्रियंका गांधी सुमारे अडीचशे ते तिनशे गावे कव्हर करतील आणि दोन्ही मतदारसंघांना समान वेळ देतील, असे सूत्रांनी सांगितले. सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अमेठी आणि रायबरेली या जागांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे.