पुणे – देशातील ज्येष्ठ नेत्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) अपमान करतात. त्यांची ही भाषा पंतप्रधानपदाला शोभणारी नाही. त्यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
महाविकास आघाडी, इंडिया आघाडी आणि काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी यांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला. या वेळी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम आदी उपस्थित होते.
पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या शरद पवारांवरील टीकेचा राहुल गांधी यांनी पुण्यात समाचार घेतला. नरेंद्र मोदींनी देशाच्या विकासाबद्दल, शेतकऱ्यांवर सद्यःस्थितीवर बोलले पाहिजे. मात्र, मोदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी बोलले म्हणजे लोकांना आवडेल असे त्यांना वाटतो का, असा प्रश्नही गांधी यांनी उपस्थित केला.
या वेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील अनेक घोषणांचा अर्थ जनतेला समजावून सांगत आगामी काळात काँग्रेस क्रांतिकारी निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. कर्नाटकातील रेवण्णा प्रकरण, जातनिहाय जनगणना, निवडणूक रोखे घोटाळा, वाढती बेरोजगारी, महागाई, संपत्तीबाबतची असमानता, माध्यमांची भूमिका आदी मुद्द्यांवर रोखठोक मते मांडली. नरेंद्र मोदी कधी पाकिस्तानची गोष्ट सांगतात, कधी समुद्राच्या खाली जाऊन ड्रामा करतात, असे सांगून पंतप्रधानांनी राजकारणाची केवळ गंमत लावली आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
संविधान संपू देणार नाही –
ही लढाई संविधान वाचविण्याची आहे; परंतु भाजप संविधान संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे. या संविधानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचे विचार आहेत. ज्यांनी जनतेसोबत संघराज्य करून देशाला दिले, ते संपविण्याच्या प्रयत्नात मोदी आहेत. तसे झाले तर मागासवर्गीयांना कोणताही अधिकार राहणार नाही. आज जे काही तुमच्या हातात आहे, ते सर्व मूठभर लोकांच्या हाती जाईल. म्हणूनच आम्ही कधीही संविधान संपू देणार नाही, अशी ग्वाही राहुल गांधी याप्रसंगी दिली.