पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे 40 आमदारांसह भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत जाणार असल्याच्या वावड्या राज्याच्या राजकारणात उठल्या आहेत. त्यामुळे 2019 मधील दादांच्या पहाटेच्या शपथविधीच्या अनुभव पुन्हा जनतेला पहायला मिळतो की काय? अशी जोरदार चर्चा राजकीय वतुर्ळात सुरू झाल्या आहेत. अजितदादांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही या चर्चा थांबण्याचे नाव घेण्यास तयार नसल्याने त्यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या चर्चेचे पडसाद शहर भाजपातही उमटू लागले असून ज्यांना विरोध करून राष्ट्रवादी सोडली त्याच अजित पवारांचे नेतृत्त्व मानगुटावर बसण्याची भिती निर्माण झाल्याने भाजपातही अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
2019 मध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप केला होता. तेव्हापासून राजकारणात कधी काय होईल, कधी बाजी पलटून नवीन समीकरणे जोडली जातील, याचा राजकीय पंडितांनाही अंदाज व्यक्त करणे कठीण जात आहे. कोणाच्या ध्यानी म्हणी नसताना जून 2022 मध्ये राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून स्वतंत्र गट स्थापन केला आणि भाजपच्या साथीने मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले. मात्र, शिंदे यांचे मुख्यमंत्री पद हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अंवलबून आहे. गेल्या 10 महिन्यात सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्ताकारणवर सुनावणी सुरू होती.
सुनावणी होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असताना आता निकालाची प्रतिक्षा राज्यातील राजकीय मंडळींसह जनतेला लागली आहे. मात्र, एका इंग्रजी वर्तमान पत्रात भाई म्हणजे एकनाथ शिंदे जाणार आणि अजितदादा येणार अशी बातमी छापून येताच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाची शक्यता व्यक्त करण्यात आली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अस्वस्थ असून ते लवकरच आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत सत्तेत जातील, अशी चर्चा सुरू झाली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर अजितदादा, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची प्राथमिक बैठकही झाल्याची खमंग चर्चा रंगविण्यात आली. तसेच काही दिवसांपूर्वी अजितदादा अचानक नॉट रिचेबल झाल्याने या राजकीय चर्चांना अधिक बळ मिळाले.
तसेच शिंदे गटाकडून अजितदादा नाराज असल्याच्या गोष्टींना खंतपाणी घातले. या सर्व घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी व माजी नगरसेवकांमध्ये कमालाची अस्वस्था पसरली आहे. दादांनी स्वतः माध्यमांसमोर येत आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहोत, असे स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही दादांबद्दलच्या चर्चा थांबण्याचे नाव घेत नसल्याने या अस्वस्थतेमध्ये भरच पडली आहे.
शहर भाजपातही अस्वस्थता
पिंपरी-चिंचवड शहर भाजपामध्ये अजित पवारांच्या चर्चेमुळे अस्वस्थता आहे. सध्या भाजपचे नेतृत्त्व करणारे बहुतांश पदाधिकारी, आमदार व माजी नगरसेवक हे राष्ट्रवादीमध्येच होते. सत्तेची आस आणि भाजपमधील संधीचा फायदा घेत या नेतेमंडळींनी राष्ट्रवादीवर टीका करत भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. तेच अजित पवार भाजपात आल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांचाच शब्द अंतिम राहण्याची शक्यता असल्याने भाजपच्या शहर पातळीवरील वरिष्ठ नेत्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता आहे.