राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार; नव्या उमेदीने लोकांमध्ये जाणार
सातारा – महाराष्ट्रातला तरुण वैचारिक बैठक असणारा आहे. त्यामुळे नव्या पिढीसमवेत लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभा राहणार आहे. नव्या कार्यकर्त्यांना संधी देत महाराष्ट्राचे नवीन चित्र निर्माण करणार आहे. त्यामुळेच हा राज्यव्यापी दौरा सुरू करत आहोत, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पक्ष सोडून गेले त्यांना माझा आशीर्वाद होता असे सांगून काही जण संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नव्हे, असा निशाणा शरद पवार यांनी साधला.
येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार प्रथमच आले होते. कराडमध्ये प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत त्यांनी आपला राज्यव्यापी दौरा सुरू केला. सातारा आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला अतिशय उत्तम आहेत.
साताऱ्याची माती कधीही अन्याय सहन करत नाही, येथील लोक अन्यायाचे बरोबर परिमार्जन करतात. त्यामुळेच मी साताऱ्याची निवड केल्याचे शरद पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर मार्मिक टोलेबाजी केली. पवार म्हणाले, “”राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली असे मी म्हणणार नाही. माझे सहकारी मला सोडून गेले. मला कशाचं दुःख नाही. या अवघड परिस्थितीचा मला जुना अनुभव आहे आणि अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे. माझा आशीर्वाद घेऊन निर्णय घेतल्याचे सांगून काही जण संभ्रम निर्माण करत आहेत.
सोडून गेलेले अनेक जण योग्य वेळी निर्णय जाहीर करतील. फक्त त्यांच्याकडे किती, आमच्याकडे किती हे विचारून तुम्ही घाई करू नका.” ज्यांच्या विरोधात आमचा संघर्ष आहे, त्यांच्यासोबत आमचे सहकारी गेल.े पण नव्या पिढीला आम्ही नाउमेद होऊ देणार नाही. राष्ट्रवादी मजबूत करायला पुन्हा एकदा उभ राहणार आहे. नव्या कार्यकर्त्यांना संधी देत महाराष्ट्राचा चित्र पालटवणार आहे. नवीन पिढीने जोमाने काम करावे म्हणून हा दौरा सुरू केला आहे. तरुणांना दिशा दिली आणि कार्यक्रम दिला तर दोन- तीन महिन्यांत राष्ट्रवादी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपकडून धार्मिक भेद निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराच्या आरोप केले होते. पण मी राजकारण करणार नाही, फडणवीस यांनाच विचारा की तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्यांना राष्ट्रवादीसोबत कसं सरकार तयार केलं,असे ते म्हणाले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केलेल्या आमदारांबाबत घेतलेल्या निर्णयांबद्दल शरद पवारांनी सांगितले की जयंत पाटलांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा अधिकार आहे.
पक्षफुटीनंतर कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया पवार आणि आमदार रोहित पवार काहीसे व्यतिथ झाल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पवार म्हणाले, “पक्षाचा अध्यक्ष जर एनर्जेटिक असेल तर कार्यकर्त्यांना रिचार्ज व्हायला वेळ लागणार नाही.’ पवारांनी हे सांगताच कार्यकर्त्यांनी जोरदार गजर करत “शरद पवार, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’ अशा घोषणा दिल्या. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील उपस्थित होते.