चाफळ (प्रतिनिधी) – काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये चाफळ परिसराची काय परिस्थिती होती, हे आपल्याला माहितच आहे. परंतु पालकमंत्री शंभूराजे यांनी महायुतीच्या माध्यमातून या परिसराचा कायापालट आपण केला आहे, जनता त्यांच्या पाठीशी आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले.
चाफळ तालुका पाटण येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या संवाद मिळाव्यात ते बोलत होते .यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवदौलत बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, भरत साळुंखे, गुलाबचाचा, प्रशांत पाटील, दादासाहेब सुतार तसेच शिवसेना ,राष्ट्रवादी, आरपीआय आणि भाजपचे आजी-माज जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींचे सदस्य उपस्थित होते.
उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून या परिसराचा विकास गतीने होत आहे. त्यांना तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. शंभुराज देसाई यांनी, देशासह राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विकासाची घोडदौड सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची आम्हाला साथ मिळाली. त्यामुळेच या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने विकास घडवू शकलो. विकासाच्या मुद्द्यावरच लोक आपल्या पाठीशी आहेत. आता लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना लोकसभेत पाठवावे, असे आवाहन केले.