PM Narendra Modi In Pune : महाराष्ट्राने देशात अनेक वर्ष राजकीय स्थिरता दिली आहे. काही स्वप्न अधुरी राहिले की आत्मा भटकता राहतो. महाराष्ट्र हे भटक्या आत्म्याचा शिकार झालेले आहे. 45 वर्षांपूर्वी येथील एका नेत्याने या खेळाला सुरवात केली. तेव्हापासून राजकीय अस्थिरतेचा खेळ सुरू झाला. ते केवळ विरोधकांना अस्वस्थ करत नाही, ही आत्मा कुटुंबाला देखील सोडत नाही, अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पुण्यातील रेसकोर्स येथे पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रकांत पाटील, मनसे नेते अमित ठाकरे, सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, रूपाली चाकणकर, खा.मेधा कुलकर्णी, डॉ नीलम गोऱ्हे, प्रकाश जावडेकर यांसह आदी नेते उपस्थित होते.
पीएम मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –
– या भूमीने अनेक समाज सुधारक देशाला दिले. आज ही भूमी जगाला संशोधक देत आहे.
– पुणे जेवढे प्राचीन आहे तेवढे भविष्यकडे वाटचाल करणारे आहे. पुणे तिथे काय उणे.
– काँग्रेसने देशात 60 वर्ष राज्य केले पण त्यांनी मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला नाही.
– आम्ही सहा वर्षात मूलभूत सुविधा पूर्ण केल्या पण त्यासोबत प्रत्येक वर्गाची आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
– विविध विकास प्रकल्प हे विकसित भारताचे स्वप्न आहे.
– मोदी यांची गॅरंटी आहे देशाच्या पहिले बुलेट ट्रेन मध्ये तुम्ही प्रवास करताल.
– काँग्रेसने मनमोहन सिंग रिमोट कंट्रोल सरकार काळात दहा वर्षात जे पैसे मूलभूत गरजांवर खर्च केले ते आम्ही एक वर्षात करत आहे.
– स्टार्टअप इंडिया मध्ये युवकांनी सव्वा लाख स्टार्टअप बनवले आहे. त्यातील अनेक पुण्यात आहे.
– रीफॉर्म , ट्रान्सफॉर्म, परफॉर्म यावर भर दिला आहे.
– देश जगात आपली ताकद दाखवून देत आहे. सर्वाधिक पेटंट आपले युवक नोंदणी करत आहे.
– दहा वर्षापूर्वी मोबाईल आयात करत होतो पण आता आपण जगात दुसऱ्या क्रमांकाचे निर्यातदार बनलो आहे.
– मेड इन इंडिया अंतर्गत विविध क्षेत्रात विकास संधी दिली जात आहे.
– संशोधन हब, सेमी कंडक्टर हब, हायड्रोजन हब यावर लक्ष्य केंद्रित केले जात आहे.
– मध्यमवर्गीय, गरीब यांना दिलासा देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले आहे.
– काँग्रेसच्या युवराजला विचारले की, गरिबी कशी हटणार ते सांगते खटाखट, खटाखट, खटाखट..विकास कसा ठकाठक ,ठकाठक,ठकाठक..विकसित भारत टकाटक,टकाटक,टकाटक..
– ते आता देशातील नागरिकांच्या संपत्तीवर लक्ष्य केंद्रित करत आहे.
– काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सतत अपमान केला आहे.
– भाजपने संविधान दिवस सुरू केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित स्थाने तीर्थेरुपात विकसित केले.