राजगुरूनगर – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील त्याच त्याच व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान मिळते. जे शरद पवार यांनी केले तेच अजित पवार करीत आहेत. भाकरी कधी फिरवणारच नाही का? आहे त्या लोकांनाच संधी देणार का? जे पवार यांनी केले तेच अजित पवार करतात का? शरद पवार यांनी तर कधी आमचे ऐकलेच नाही. त्यांच्यावरच आम्ही कायम विश्वास ठेवला. आता अजित पवारही तेच करणार असतील तर तालुक्यातील जनतेसोबत चर्चा करून जनता, कार्यकर्ते काय निर्णय घेतात त्याच्या निर्णयासोबत मला जावे लागेल, अशी स्पष्ट भूमिका खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मांडली.
शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत दिलीप मोहिते पाटील म्हणाले, गोष्टी सत्य आहे, माझ्या राजकारणाची सुरुवात आणि राष्ट्रवादी पक्षात आणले ते अजित पवार यांनीच आणले. अजित पवार यांच्यामुळे आमचे अस्तित्व आहे. माझ्या सुख-
दुःखात अजित पवार हेच नेहमी धावले आहेत. त्यांच्यामुळे मी आमदार झालो ही खरी गोष्ट आहे. माझी राजकीय कारकीर्द अजित पवार यांनीच घडवली हेही सत्य आहे; मात्र रविवारी (दि. 2) जे झाले ते अनपेक्षित आहे.
आमदार मोहिते काय निर्णय घेणार?
एकूणच शेजारच्या आंबेगाव तालुक्याला नेहमीच मंत्रिपद मिळाले आहे. खेड तालुका मात्र मंत्रिमंडळात समावेश होण्यापासून दूर जात आहे, त्यामुळे येत्या काही दिवसात आमदार दिलीप मोहिते पाटील काय निर्णय घेतात लक्ष लागले आहे.
ज्यांनी पक्ष अडचणीत आणला…
अजितदादांनी जे निर्णय घेतले त्यातील काही निर्णय 100 टक्के हे आम्हाला पसंत नाहीत. रविवारीही यावर आमची चर्चा केली होती. आमच्या राजकीय जीवनात दिलीप वळसेपाटील यांनी अनेक अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत. म्हणून सातत्याने वळसे पाटलांना विरोध केला होता. त्यावेळी अजित पवार सांगायचे हे शरद पवार यांनी घेतलेले निर्णय आहेत. त्यांना विरोध करू शकत नाही. आणि पवार सांगायचे वळसे पाटील हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्याकडे आम्ही कानाडोळा केला. मात्र, आज जेव्हा अजित पवार निर्णय घेतात त्यामुळे आम्ही खूप अस्वस्थ झालो आहोत. ज्या माणसांमुळे या लोकांमुळे मग ते दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यामुळे पक्ष अडचणीत आला त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करायचे का? हा प्रश्न आमच्या सर्व आमदारांच्या मनात आला आहे त्यामुळे आम्ही सर्व आमदार अस्वस्थ झालो आहोत.
त्याच त्याच व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान
मोहिते पाटलांनी सांगितला शपथविधीचा घटनाक्रम
अजित पवार यांनी आम्हा सर्वांना बोलावले. आम्हाला असे वाटले उद्याचे अधिवेशन आहे म्हणून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल, असे वाटले म्हणून आम्ही मुंबईला पोहोचलो. प्रत्यक्षात शपथविधीबाबत कोणतीच चर्चा झाली नाही. आपण बीजेपीत जाणार आहोत, आजच त्याचा शपथविधी होणार आहे. आमच्या कागदावर सह्या घेतल्या. सह्या घेतल्यानंतर पावणेदोन वाजता आम्हाला सांगितले आपल्याला शपथ घ्यायची आहे. मंत्रिमंडळात कोणाला घेणार, कोणाला नाही घेणार याबाबत कोणतीच कल्पना नव्हती त्यावेळी तेथे पोहोचलो त्यावेळी तेथे प्रफुल्ल पटेल, रामराजे निंबाळकर, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आदी नेते होते नंतर सुप्रिया सुळे तेथे आल्या. आमचा समज झाला की अजित पवार जी भूमिका घेतात ती पक्षाची भूमिका आहे. आम्ही सर्व शपथविधीला गेलो तेथे सुप्रिया सुळेदेखील होत्या. आम्ही तेथून शिर्डीला आलो त्यानंतर टीव्हीवर बातम्या येत होत्या त्यात शरद पवार, जयंत पाटील वेगवेगळ्या भूमिका मांडत होते. बातम्या पाहता शरद पवार यांचे दादांना
समर्थन नाही.