पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील रस्त्यांवर अनेकांनी आपली वाहने बेवारसपणे सोडली आहेत. ती महापालिकेकडून जप्त केली जाणार आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. तसेच या बंद वाहनांमुळे रस्ते स्वच्छता करण्यात अडचणी येत आहेत. अशा तब्बल ७०० बेवारस वाहनांवर नोटीस लावल्या आहेत.
ज्या मालकांनी आपली वाहने बेवारस सोडली आहेत, त्यांनी ती सात दिवसांत रस्त्यावरून घेऊन जाण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर ज्या वाहनमालकांनी अद्यापही वाहने काढलेली नाहीत त्यांची वाहने सोमवारपासून जप्ती सुरू करण्यात आली आहे. या नोटीस लावण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेतली जात आहे.
शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे, महापालिकेकडून ही कोंडी फोडण्यासाठी शहरात वेगवेगळया उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर पदपथावर, मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी बंद बेवारस वाहने, पडीक नादुरुस्त वाहने आढळत आहेत.
अशी वाहने रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच सदर वाहने जागेवरून न हलविल्यामुळे कचरा तयार होऊन दुर्गंधी होत आहे. त्यामुळे महापालिकेने मागील वर्षी याबाबत कारवाई केली होती. त्यानंतर, रस्त्यावरील वहानांची संख्या कमी झाली होती, मात्र, त्याबाबत तक्रारी पुन्हा वाढल्या आहेत.
दंड भरावा लागणार
अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या माहितीनुसार, संबंधित वाहनमालक आपले वाहन एका महिन्यात सोडवून घेऊ शकणार आहे. त्यासाठी महापालिकेने दंडाचे शुल्क निश्चित केले आहे. मात्र, जी वाहने सोडविली जाणार नाहीत त्यांचा लिलाव महापालिकेकडून केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना महापालिका एक संधी देणार आहे.
असा आहे वाहन सोडविण्याचा दंड (रुपयांत)
– अवजड वाहनासाठी (प्रवासी बस, ट्रक ) – २५,०००
– हलकी वाहने (१० टनापर्यंत) – २०,०००
– चार चाकी वाहने (कार, जीप इ.) – १५,०००
– तीन चाकी (रिक्षा, टेम्पो) – १०,०००
– दुचाकी (स्वयंचलित) – ५०००