पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युतीशी घरोबा केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली आहे. येत्या बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी दोन्ही गटांकडून जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्ते यांना फोनाफोनी सुरू झाली आहे. बैठकीच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याने पदाधिकाऱ्यांना निमंत्रणे धाडण्यात आली आहेत. त्यामुळे कोणत्या बैठकीस उपस्थित राहायचे तसेच कोणत्या गटाकडे जायचे, असा संभ्रम पदाधिकाऱ्यांचा झाला असून, “साहेब की दादा?’ या दोघांपैकी कोणाची निवड करायची, असा यक्ष प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागात तसेच उपनगरांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद मोठी आहे. तसेच शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा थेट परिचय आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून हे पदाधिकारी आपल्या गटात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक येत्या बुधवारी होणार असून, या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे.
तर दुसरीकडे अजित पवार यांनी सुद्धा बुधवारीच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. या दोन्ही नेत्यांकडून यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. कोणाची ताकद किती आहे, तसेच कोण-कोण आपल्यासोबत आहेत, हे दाखविण्याची ही संधी आहे. त्यामुळे दोन्ही गटांतील प्रमुख नेत्यांनी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांना फोन केल्याचे समजते. काही तालुकाध्यक्षांना याबाबत विचारले असता त्यांनी दोन्ही गटांकडून फोन आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र कोणासोबत जायचे, याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर तसेच काही तालुक्यात गट-तट आहेत. त्यामुळे आपला विरोधक गट कुठे जातो यावरून आपण ठरवू साहेबांकडे जायचे की दादांकडे, असे चित्र काही तालुक्यांमध्ये आहे.
“वेट ऍण्ड वॉच’
जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते अजूनही संभ्रमावस्थेत आहेत. तुम्ही कोणत्या गटाकडे आहात, असे विचारले असता बहुतेक पदाधिकारी यांनी “वेट ऍण्ड वॉच’ची भूमिका घेतली. अजून दोन-चार जाऊ द्या, चित्र स्पष्ट होऊ द्या, मग बघू, असे सांगत तटस्थ भूमिका मांडली.