नवी दिल्ली – राज्याच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्रीपदावरून सुरू झालेला सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. दोन्ही पक्षातील वाद चांगलाच पेटल्याने रविवारी शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढण्यात आले. यावर एनडीएतून आम्हाला बाहेर काढणारे तुम्ही कोण असा सवाल करत सेनेने भाजपला केला. या पार्श्वभूमीवर आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे.
मोहन भागवत म्हणाले कि, स्वार्थाने विनाश होतो हे सर्वांनाच माहित आहे. तरीही स्वार्थ सोडत नाही. आपापसातील वाद दोघांसाठीही हानीकारक ठरेल, असा सल्ला वजा समज त्यांनी दिली आहे. राज्यातील स्थितीच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवतांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर ५०-५०च्या फॉर्म्युल्यावरून भाजप-शिवसेनेचा वाद विकोपाला गेला आहे. दोन्ही पक्षात मुख्यमंत्रीपदावरून बिनसल्याने शिवसेना कमळाची साथ सोडत काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सत्तास्थापनेचे भाजप-शिवसेनेने बघावे, या विधानाने राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच मोहन भागवतांनी दिलेला सल्ला भाजप-शिवसेना मान्य करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी राज्यात शिवसेनाच सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच सुरू होणार असल्याचा घणाघात केला. तसेच महाराष्ट्रात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरकार स्थापन होईल असा विश्वास राऊत यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.