नवी दिल्ली – यावेळच्या लोकसभा निवडणुकीतील दोन टप्प्यांसाठी आतापर्यंत मतदान झाले. मात्र, दोन्ही टप्प्यांतील मतदानाचा टक्का मागील निवडणुकीपेक्षा (वर्ष २०१९) कमी नोंदला गेला आहे. यावेळच्या सर्वांत मोठ्या आणि पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिलला १०२ जागांसाठी मतदान झाले.
त्या टप्प्यात ६५.५० टक्के मतदारांनी हक्क बजावला. मागील वेळी पहिल्या टप्प्यात ९१ जागांसाठी ६९.४३ टक्के मतदान झाले. अर्थात, त्यावेळी काही मतदारसंघ वेगळे होते. यावेळी दुसऱ्या टप्प्यासाठी २६ एप्रिलला ८८ जागांसाठी मतदान झाले.
त्याची औपचारिक टक्केवारी अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील मतदान ६६.७० टक्के इतके असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागील निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात ९५ मतदारसंघ मतदानाला सामोरे गेले.
त्यावेळी ६९.६४ टक्के मतदारांनी कौल दिला होता. त्यामुळे यावेळच्या पहिल्या दोन टप्प्यांत मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून येत आहे. अनेक मतदार हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांकडे न फिरकण्यामागे उष्णतेची लाट हे एक कारण सांगितले जात आहे.