लखनौ – लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यात भाजपची स्थिती आणखी बिकट होईल, असा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला. पहिल्या टप्प्यातच भाजपचा पराभव होणार हे निश्चीत झाले होते. काल पार पडलेल्या दुसऱ्या टप्यातही भाजपला मोठा दणका बसला असून उर्वरीत टप्प्यांमध्ये त्यांची स्थिती आणखी बिकट होत जाईल असे ते म्हणाले.
एक्स वरील एका पोस्टमध्ये, त्यांनी दावा केला की भारतीय जनता पक्षाला पहिल्या दोन टप्प्यात मतदार मिळालेले नाहीत आणि उर्वरित टप्प्यात बूथ एजंटही मिळतील की नाही याची शंका आहे.
भाजप सत्तेतून हद्दपार होण्याची खात्री मतदार व्यक्त करीत आहेत असे त्यांनी नमूद केले. त्यांनी एक्सवर भाजपच्या एका बुथ एजंटची व्हिडीओ क्लीप शेअर केली आहे. त्यात हा भाजपचा एजंट पक्षाची स्थिती बिकट असल्याचे नमूद करीत आहे. लोक भाजपच्या बाजूने मतदान न करण्यामागचे कारण महागाई आणि बेरोजगारी असल्याचे ते सांगत आहेत, असा दावा यादव यांनी केला.