मुंबई -लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्रातील ८ जागांवर मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या सुधारित आकडेवारीनुसार राज्यात ५९.६३ टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात वर्ध्यात सर्वांधिक ६२.६५ टक्के मतदारांनी हक्क बजावला.
अमरावती, हिंगोली आणि परभणीतील मतदानाने ६० टक्क्यांची पातळी ओलांडली. अकोल्यात ५८.०९ टक्के, बुलढाण्यात ५८.४५ टक्के, तर नांदेडमध्ये ५९.५७ टक्के मतदान झाले. यवतमाळ-वाशिममध्ये सर्वांत कमी (५७ टक्के) मतदानाची नोंद झाली.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानामुळे २०४ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (इव्हीएम) बंद झाले. राज्यात पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिलला ६३.७० टक्के मतदान झाले.
त्या टप्प्यात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली हे ५ मतदारसंघ मतदानाच्या प्रक्रियेला सामोरे गेले. राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत.
त्यातील १३ जागांसाठी पहिल्या दोन टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. राज्यात एकूण ५ टप्प्यांत मतदान होईल. आता उर्वरित ३५ जागांसाठी इतर ३ टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया पार पडेल.