मुंबई : राज्यात सुरू असलेले सत्तानाट्य दररोज नवनवीन वळण घेत असून आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला.अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या समर्थनातील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धर्मारावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याच राजकीय नाट्यावर महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट मत मांडले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय भूकंप ही शरद पवारांची खेळी असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच पवार साहेब काहीही म्हणो, हे नेते पाठवल्याशिवाय जाणार नाहीत, असा दावा देखील यावेळी त्यांनी केला आहे. त्यासोबतच ”महाराष्ट्रात गेल्या दोन-अडीच वर्षापासून जे राजकारण सुरु आहे, ते दिवसेंदिवस किळसवाणं होत चाललंल आहे. या कोणलाही मतदारांनी काहीही देणं-घेणं नाही. कोणत्याही पक्षाचे कट्टर मतदार ते त्या पक्षाचे का मतदार होते, याचा सर्वांना विसर पडला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी वाटेल ती तडजोड करायची ही महाराष्ट्रामध्ये पेव फुटलं आहे.”असे त्यांनी यावेळी म्हटले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, ”एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पवार साहेब कितीही, काहीही म्हणत असले की, त्यांचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही. तरी, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे नेते असेच पाठवल्याशिवाय जाणार नाहीत. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरीही मला आश्चर्य वाटणार नाही.”असे त्यांनी यावेळी म्हटले
त्यासोबतच मला असं वाटतं लोकांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. मी पुढच्या काही दिवसात मेळावा आणि बैठक घेणार आहे. मला महाराष्ट्राशी बोलायचं आहे. लवकरच पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र दौरा सुरु होईल. त्यावेळी जागोजागी जाऊन लोकांना भेटेन, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 2, 2023
दरम्यान, कालच त्यांनी एक ट्विट करत राज्यात झालेली घडामोडींवर मत व्यक्त केले होते. त्यात त्यांनी, “आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला . उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?” असे म्हटले होते.