पाचोड – उन्हाचा कडाका वाढला की, शीतपेये प्रत्येकाला हवीहवीशी वाटतात. साहजिकच गुऱ्हाळे, उपाहारगृहे, सरबत विक्रेते यांच्यासह महिलांकडून लिंबांची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत बाजारातील लिंबाची आवक पुरेशी नसल्याने भाव वाढले आहेत.
घाऊक बाजारात १५ किलोंच्या गोणीचा भाव ५०० वरून १५०० रुपयांवर गेला आहे, तर किरकोळ बाजारात २० रुपयांत चार ते पाच नग अशी विक्री होते. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता वाढल्याने फळांच्या रसाबरोबर लिंबूपाणी, लिंबू सरबतांची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात लिंबांचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
आता एप्रिल सुरू असून लिंबाचा दर मे संपेपर्यंत तरी हेच चित्र राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. त्यामुळे लिंबू खरेदी करताना एक किंवा दोन लिंबू घेऊनच ग्राहकांना समाधान मानावे लागत आहे. लिंबाचे अनेक फायदे असल्यामुळे त्याची मागणी वर्षभर असते.
उन्हाळ्यात ही मागणी अधिक वाढते. या दिवसांमध्ये लिंबाचे सरबत जवळपास घरोघरी बनते. परिणामी पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी दुप्पट असते. यंदाही अशीच स्थिती आहे. मार्चपासून लिंबाचे दर सातत्याने वाढत होते. मार्चमध्ये शेकड्यामागे १२५ ते १५० रुपयांदरम्यान लिंबू विकले जात होते. त्यापूर्वीचा दर १०० रुपयेही होता, पण उन्हाळा सुरू होताच आवक कमी झाली आणि दरवाढ सुरू झाली आहे.
दुष्काळी परिस्थितीचा फटका
यंदा बदलते हवामान आणि दुष्काळी परिस्थितीचा फटका लिंबाच्या पिकाला बसला आहे. दुष्काळामुळे अनेक ठिकाणी लिंबाच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारातील मागणीनुसार पुरेसा पुरवठा न झाल्याने लिंबाच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया ग्राहक मंगेश शिकारे यांनी दिली आहे.