ठाणे – पर्यटकांना भुरळ घालणारे धार्मिक स्थळ म्हणजे अहमदनगरमधील अकोले येथील हरिश्चंद्रगड. मात्र येथील हेमाडपंती शिवमंदिरातील ५ फुटांच्या शिवपिंडीला तडे गेल्याचे समोर आले आहे. यामुळे शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कोकणकडा पाहण्यासोबतच येथील हेमाडपंती शिवमंदिर पर्यटकांना आकर्षित करते. साधारणत: दहाव्या-अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे एक मंदिर आहे.
ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या हरिश्चंद्रगडाचा परिसर पुरातत्त्व विभागाकडे आहे. मात्र, विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे भक्तांचे म्हणणे आहे.
५ फूट रुंंद व ५ फूट लांबीच्या शिवपिंडीचे जतन व संवर्धन व्हावे अशी मागणी पाचनईचे सरपंच भास्कर बादड व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच, पिंडीला वज्रलेपन करण्याचीही सुचना पर्यटकांकडून होत आहे.
मूर्ती-मंदिराची विटंबना थांबवावी
हरिश्चंद्रगडावरील महादेवाची पिंड जीर्ण झाली आहे. पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. आम्ही निधीतून वज्रलेपन केले. या ठिकाणीही प्रतिष्ठान काम करू शकेन. याबाबत पत्रही दिले आहे, अशी माहिती श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गौरव घोडे यांनी दिली आहे.
प्रतिष्ठानकडून मंदिरांमध्ये वज्रलेपन
श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानने स्वखर्चातून जेजुरीतील रमाई माता, बानुआईचे मंदिर व मूर्तींना वज्रलेप, निमगाव धावडीतील स्वयंभू पंचलिंगेश्वर मंदिर, संभाजीनगरातील खंडोबा मूर्तींना वज्रलेप, सोलापुरातील शिवलिंग गणपती मंदिर,
हनुमान मंदिर, नंदी यांचे तर नेवासामधील म्हाळसा आईच्या गावातील खंडोबा मदिरात मूर्ती, येडेश्वरी येरमाळातील सीतामाईची पावले, कर्नाटकातील यादगिरी मैलापूर खंडोबा येथे तुपासिंह खंडोबा, वीरभद्रेश्वर हेगडे प्रधान मंदिरात वज्रलेपन केले.