मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. कारण महाविकास आघाडीकडून एकनाथ शिदे अपात्र ठरणार असल्यामुळेच अजित पवारांच्या शपथविधीचा घाट घातला गेल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवारांचा शपथविधी एकनाथ शिंदेंना पर्याय म्हणून करून घेण्यात आला असून अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असा दावा ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, येत्या १० ऑगस्टपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना करावीच लागेल, त्यानुसार शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरतील, असा दावाही संजय राऊतांनी केला आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरेंना ‘एकला चलो रे’चा सल्ला दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “उद्धव ठाकरे आपली भूमिका येत्या दोन दिवसांत स्पष्ट करतीलच. पण एक मात्र नक्की. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला, शिवसैनिकांना असं वाटतंय की आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र चलो, एकेला चलो हा नारा द्यावा आणि पुढच्या राजकीय कामकाजात सहभागी व्हावं. ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे”, असे विनायक राऊत म्हणाले आहेत.