कामशेत (वार्ताहर) – मावळ तालुक्यात जवळपास एक हजार उत्पादक कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. शेतात शेड उभारून अनेकजण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे कोंबड्या जगवायच्या कशा ? असा प्रश्न कोंबडी उत्पादकांना पडला आहे. तर काही उत्पादकांनी कोंबड्यांच्या शेडमध्ये कुलर लावले आहेत.
मावळ तालुक्यात पिल्ले तयार करणाऱ्या पोल्ट्रीची तालुक्यात मोठी संख्या आहे. या पोल्ट्रीमधून राज्यासह परराज्यात कोंबडीची पिल्ले पाठविली जातात. गावरान कोंबडीला सध्या राज्यात मोठी मागणी आहे. केवळ शंभर दिवसांत उत्पन्न हातात पडते. यामुळे व्यवसायात अनेक तरुणांनी उडी घेतली आहे. शहरासह तालुक्यात कोंबडी खाद्याचे अनेक व्यावसायिक आहेत. कोंबड्यांना लागणाऱ्या औषधाचेसुद्धा अनेक मेडिकल दुकाने आहेत.
तालुक्यासह गावरान कोंबडीला राज्यातही मोठी मागणी आहे. पाचशे कोंबड्यांपासून ते दहा हजार कोंबड्यांपर्यंतचे शेड तालुक्यात अनेक ठिकाणी आहेत. सध्या उन्हाची तीव्रता वाढीस लागल्याने कोंबडी उत्पादक धास्तावले आहेत. उन्हाचा पारा वाढल्याने उष्माघाताने कोंबड्या मृत पावण्याच्या घटना वारंवार होत आहेत. हिवाळ्यात थंडी वाढली तर शेकोटी केल्यास उष्णता निर्माण करून थंडीपासून बचाव करता येतो.
कोंबड्यांसाठी कुलर
सध्या उन्हाचा पारा चाळीसच्या पुढे गेल्याने कोंबड्या जगवायच्या कशा असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून शेडमध्ये कुलर बसवले आहे. यामुळे वीजबिलाचा खर्च वाढला असला तरीही कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास होत नाही व त्या मृत पावत नाहीत, हे महत्वाचे आहे.
उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शेडमध्ये गारवा निर्माण व्हावा, उकाड्यापासून त्रास कमी व्हावा म्हणून शेडधारकांनी कुलर बसवण्यास सुरवात केली आहे. कुलर बसवल्याने कोंबड्यांना थंड हवा मिळून उष्माघाताचा त्रास होत नाही. – सुनील वाघमारे, पोल्ट्री व्यवसायिक.