मुंबई : राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडून आज राज्यात धाडसत्र सुरु आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून एनआयएने मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएने आयएसआयएसच्या संपर्कात असलेल्या नागपाडा रहिवाशाविरुद्ध 28 जून रोजी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी संशय आणखी बळावल्याने एनआयएकडून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे.
आयएसआयएसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मुंबईतील नागपाडा येथील रहिवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा झाल्यानंतर एनआयएला संशय आला की, आणखी काही जण आयएसआयएसच्या संपर्कात आहेत आणि त्यानुसार एनआयएकडून छापे टाकले जात आहेत. एनआयएने पाच ठिकाणी छापेमारी सुरु असून त्यामध्ये मुंबई आणि भिवंडी प्रत्येकी दोन-दोन ठिकाणी आणि पुण्यात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहेत.
मुंबईसह पुण्यात एनआयएकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. नागपाडा येथील नागपाडा पोलीस ठाण्याजवळ छापा टाकण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती अनेक दिवसांपासून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होती, असा दावा एनआयएच्या सूत्रांनी केला आहे.
पुण्यात एनआयए आणि आयबीची छापेमारी सुरु आहे. दोन्ही पथकाकडून कोंढव्यात छापे टाकण्यात आले असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. आज पहाटे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीमध्ये एनआयए आणि आयबी पथकाकडून छापेमारी करण्यात आली. जुबेर शेख, वय 39 वर्ष याला चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि आयबी यांनी संयुक्तरित्या छापा मारून ताब्यात घेतले आहे.