पावसाळ्यातील बुधवार पुण्यासाठी घातवार ठरतोय. विशेषत: परतीचा पाऊस सुरू होतो तेव्हा तो शहराच्या मुळावरच उठतो. गेल्या वर्षी 25 सप्टेंबर 2019 रोजी मुसळधार पाऊस झाला होता. अगदी तसाच किंबहुना त्यापेक्षा मुसळधार तो काल कोसळला. तास दोन तासांच्या पावसाने पुणेकरांचे प्राण कंठाशी आले.
नद्यांच्या जवळपास असणाऱ्या सोसायट्या आणि तेथील रहिवासी गॅसवरच असतात, पण आता मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्यांचा जीवही टांगणीला असतो. घरापर्यंतचा रस्ता मोकळा असेल की नाही याची शाश्वतीच नाही. कालच्या म्हणजे बुधवारच्या पावसाने पुन्हा त्याची प्रचिती दिली. सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर मात्र अंगात वारे शिरल्यासारखा तो कोसळला. रस्ते आणि महामार्गही बंद करून टाकले. अनेक घरांत आणि सोसाट्यांतही पाणी शिरले. शहरात काही विशेष ठिकाणे अशी आहेत, की जेथे चारही बाजूने वेगाने पाणी येते व साचते. ते गुडघ्याची उंची ओलांडून कंबरेपर्यंत जाते. अशा स्थितीत दुचाकी आणि चारचाकी पुढे रेटणे शक्य नसते. जे तसा प्रयत्न करतात त्यांना दुर्दैवाने प्राण गमवावे लागतात.
गेल्या वर्षी अशी दुर्दैवी घटना घडली. या पावसाने दुचाकीस्वार आणि चार चाकीवाल्यांनाही आपल्या प्रवाहात ओढून नेले. एकट्या शहरातच 21 ते 26 जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मुंबईचे उदाहरण आपल्या समोर आहे. त्याच्या बातम्या गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय. “आला पावसाळा मुंबई सांभाळा’ अशी स्थिती, पण मुंबईच्या बातम्या वाचून पेपर बाजूला ठेवला गेला. रेल्वेस्थानकांवरची गर्दी, रस्त्यांवर अडकून पडलेल्या गाड्या, घरातून बाहेर पाणी फेकणारे कुटुंबीय हे सगळे केवळ मुंबईतच असे वाटण्याचा तो काळ. मात्र, आता पुणेकर त्याला सामोरे जात आहेत. दोन तास जरी पावसाने जोर धरला तरी धस्स होते. काय आभाळ कोसळेल याची शाश्वती नाही.
गेल्या वर्षी त्याच्या अगोदरच्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाची चर्चा झाली. आता या वर्षी गेल्या सप्टेंबरच्या पावसाची चर्चा होतेय. स्थितीत बदल झालेला नाही. “कालचा पाऊस बरा होता’ म्हणत दिवस पुढे ढकलला जातो. आता लोकप्रतिनिधींचे दौरे सुरू झाले आहेत. नुकसानीचा आढावा ते घेतील. त्यांच्या बरोबर त्यांचे कार्यकर्तेही असतील. सरकार किंवा प्रशासन तुमच्या जीविताच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पुन्हा देतील. एखाद्या भागात संरक्षक भिंत उभारण्याचे गाजरही दाखवले जाईल. एकाच तासात इतका पाऊस कोसळल्यावर प्रशासन तरी काय करणार, अशी हतबलताही दर्शवली जाईल. लोक ऐकतील. दुसऱ्या दिवसाच्या कडक उन्हात रस्त्यावरचा ओलसरपणा जसा नाहीसा होतो तसाच नागरिकांचाही राग नाहीसा होतो. एक पावसाळा पुन्हा असाच संपून जाईल. पुढच्या वर्षी पुन्हा पावसाळाच्या तोंडावर नालेसफाईच्या बातम्या येतील.
टार्गेट आणि डेडलाइन दिली जाईल. 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जाईल. दोन तास पाऊस पडला की पुणे-सोलापूर मार्गावरची वाहतूक बंद. सिंहगड रस्त्यावर केवळ पन्नास फुटांच्या अंतरावर सागराच्या दोन तटांवर उभे असल्यासारखी माणसे दिसतील. त्यांची वाहने दिसतील. केव्हा मार्ग मोकळा होणार म्हणून ते मनोमनी देवाचा धावा करतील. कोणाला घरी जायची घाई तर कोणाला अन्य काही इमर्जन्सी. त्यातूनच एखादी ऍम्बुलन्स त्या पाण्यातच बंद पडते. हार्टऍटॅकचा पेशंट आहे की करोनाचा? कोणालाच कल्पना नाही. बंद पडलेल्या ऍम्बुलन्सला धक्का द्यायचा की नाही, द्विधा मनस्थिती. अखेर कोणाच्या तरी सल्ल्याने तुंबलेली ऍम्बुलन्स मार्गी लागते. दुचाकी व अन्य चारचाकी चालक डोळ्यात प्राण आणून व प्रचंड आशावादाने पाणी ओसरण्याची वाट पाहात असतात. हे चित्र गेल्या वर्षी होते. यंदाही आहे व जर आताच हालचाल केली नाही, तर पुढच्या वर्षीही असेल.
पुणेकर मुंबईच्या बातम्या पाहात होते. आता नाशिककर पुणे आणि मुंबईच्या बातम्या पाहतील. नंतर त्यांचा व त्यानंतर पावसाची कृपा असणाऱ्या अन्य शहरांचा समावेश होत जाईल. मराठवाड्याच्या लोकांनी इतक्यात घाबरण्याचे कारण नाही. त्यांचा अगोदरच वाळवंट झाला आहे, पण त्यांची स्थितीही कदाचित वेगळी नसेल. पावसाचा मार खाल्ल्यानंतर काही जागरूक नागरिक पुन्हा एकदा घरातून बाहेर येतात. ते त्वेषाने बोलतात. पत्र-खलिते पाठवतात. लोकप्रतिनिधींना जाबही विचारतात. काही जण त्याहीपुढे जात याचिका दाखल करतात, पण प्रश्न पुढे सरकत नाही हीच खरी शोकांतिका आहे. महापालिका आपली आहे. तेथे सत्ताधारी बदलत असतात. मात्र, पक्षाचा बिल्ला बाजूला काढून समस्येच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. आज काय दिसतेय? कालचे सत्ताधारी आजच्या सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवतात.
पावसाने पॅटर्न बदलला आहे. जूनची परीक्षा तो देत नाही. तो जुलैत येतो व त्याचा पुढचा चार महिन्यांचा कोर्स पूर्ण करतो. हल्ली त्याचा मुक्कामही लांबतो. पंधरा दिवस पडतच नाही. पडला तर विक्रमच करतो. तासाभरात तुफान मारा करतो. अशा वेळी पाणी साचून न राहता ते वाहून जाण्यासाठी ज्या जागा किंवा रस्ते आहेत, तेच आपण अडवले अथवा व्यापून टाकले आहेत. नद्यांचीच जमीन बळकावली आहे. तेथे अतिक्रमणे झाली आहेत. नाल्यांच्या कडेलाही इंच इंच जागा व्यापली गेली आहे. नद्यांच्या पूररेषा मनमानी पद्धतीने बदलल्या गेल्या असल्याचाही आरोप आहे. त्या पूर्ववत करण्याची गरज आहे. आज सगळ्यांत महत्त्वाचे जर काही असेल तर नद्यांच्या पाणलोट क्षेत्राचे संरक्षण. प्रत्यक्ष सीमेवर शत्रूपासून केले जाते त्याच तळमळीने ते करण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही प्रकारचे आणि कोणाचेही अतिक्रमण होणार नाही याची काळजी वाहणे आवश्यक आहे. सगळ्यांत महत्त्वाचे जबाबदारी.
दुसऱ्या दिवशी तुमच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी कोरडी सहानुभूती न देता पावसाळ्याच्या सुमारास केली जाणारी हालचाल वर्षभर करून प्रश्न निकाली कसा काढता येईल याचा अभ्यास आणि कृती करण्याची गरज आहे. अंतर्गत आणि बाह्य अशा सर्वप्रकारची ड्रेनेज सिस्टिम मोकळी असण्याची दक्षता घेणे. तेथे ब्लॉकेज झाले की शहराला आणि त्या त्या भागाला पुराचा झटका बसणारच. पाण्याचे जे नैसर्गिक स्रोत, मार्ग किंवा प्रवाह आहेत तेथे कोणत्याही प्रकारचा अडथळा आला तर त्याला जबाबदार व्यक्तीवर कारवाई व्हायलाच हवी. ती होणार नसेल आणि तात्पुरती डागडुजी किंवा मलमपट्टी करणार असू, तर आपण पुढच्या याहून मोठ्या संकटाची वाट पाहतोय यावर शिक्कामोर्तब होईल.
येत्या काळात पावसाचे स्वरूप असेच राहणार आहे. छोट्या कालावधीत तो जास्त बरसणार आहे. शास्त्रज्ञांनीही तसाच इशारा दिला आहे व त्याची सुरुवातही झाली आहे. शहरीकरणाची प्रक्रिया आपण रोखू शकत नाही. मात्र, शहरांना श्वास घेण्यासाठी ज्या किमान मूलभूत सुविधा अपेक्षित आहेत त्या तरी सक्षम करू शकतो. पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा हे त्यातील अत्यंत मोठे आव्हान असणार आहे. पाणी वेगात कसे बाहेर जाईल यावर अभ्यासकांची मदत घेऊन निर्णय घेतला तरच खरे. अन्यथा पावासाळ्यात प्रवासासाठी होड्यांचीच व्यवस्था करण्याचा अखेरचा पर्याय हाती राहील.