पाटणा – सुशांत सिंह प्रकरणानंतर आता मुंबईत खंडित झालेला वीजपुरवठाही प्रचाराचा मुद्दा झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नीतीश कुमार यांच्या सोमवारी झालेल्या प्रचारसभेत “मुंबई में बत्ती गुल बा, बिहार में लाइट फुल बा” अशा घोषणा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या संजय झा यांनी मुंबईतील पॉवर ब्रेकडाऊनवर सोशल मिडीयावर फिरत असलेल्या एक मजेशीर मेसेज वाचून दाखवला. यानंतर सभेच्या ठिकाणी अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे बिहार निवडणुकीच्या आगामी प्रचारातही नितीश कुमार आणि भाजपकडून “मुंबई कार्ड” वापरले जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी बिहारच्या राजकारणात भाजपकडून अभिनेता सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाचा पद्धतशीरपणे वापर करण्यात आला होता. राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाच्या तपासावर लक्ष्य करत मुंबई पोलिसांना लक्ष्य केले होते. यानंतर बिहार पोलिसांनीही मुंबई पोलिसांच्या तपासात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला. यावरुन महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
आगामी काळातही प्रचारसभांमध्ये सुशांत सिंह प्रकरणाचा मुद्दा चर्चेच राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून बिहार विधानसभा निवडणुकीची धुरा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परिणामी आगामी काळात मुंबई विरुद्ध बिहार असे चित्र कायम राहण्याची शक्यता आहे. भाजपला शह देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही बिहारमधील काही जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते प्रचारासाठी बिहारमध्ये जाणार आहेत.
विरोधकांच्या हाती आयते कोलीत
कळवा पडघा केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सोमवारी सकाळी जवळपास तीन ते चार तास मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे मुंबईतील रेल्वे वाहतूक आणि इतर दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते.
मुंबईच्या अनेक भागांत वीजपुरवठा पूर्ववत होण्यास मध्यरात्रीपर्यंत वाट पाहावी लागली. या सगळ्या प्रकारामुळे विरोधकांच्या हातात सरकारवर टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे.