मुंबई – राज्यात गेल्या 24 तासांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल 24 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात दोन, सोलापुर आणि नगरसह अन्य ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये 24 जणांचा मृत्यू झाला आहे. यात उजनी जलाशयात एकूण सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेतील सहाही लोकांचे मृतदेह तब्बल 20 तासांनंतर सापडले आहेत. राज्यात घडलेल्या या घटनांमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (24 people drowned in Maharashtra in 24 hours)
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे विहिरीत बुडून माय लेकीचा मृत्यू झाला. तर भावली धरणात पोहोण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये मामा, दोन मुली, दोन मुले अशा पाच जणांचा समावेश होता.
याशिवाय मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास उजनी जलाशयातून अवैधरित्या प्रवास करणारी प्रवाशांची बोट उलटल्याने अपघात झाला. या घटनेत तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफच्या टीमला तब्बल 40 तासांनंतर सहाही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
दुसरीकडे अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सुगावमधील रोपवाटीके जवळील पात्रात दोन युवक पोहण्यासाठी प्रवरा नदीत उतरले होते. यावेळी पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने सागर पोपट जेडगुले (वय वर्ष 25) आणि अर्जून रामदास जेडगुले (वय वर्ष 18) या दोघांचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेतील सागर जेडगुले याचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. पण आज गुरुवारी सकाळी अर्जून जेडगुले याचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफची टीम गेली असता नदीतील भवऱ्यात अडकून बोट उलटली. ज्यामध्ये पाच एसडीआरएफच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या घटनेत दोन तरुण आणि पाच एसडीआरएफचे जवान अशा जणांचा मृत्यू झाला आहे. या चार घटनांशिवाय गेल्या 24 तासांमध्ये पुणे, बीड आणि नागपुरातही बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती समोर आली आहे.