पत्रकार परिषदेतून उठून चालू लागले
आघाडीच्या जागा वाटपात मित्रपक्षांना 48 जागा
श्रीरामपूर – नेत्यांबरोबर नातेवाईकही पक्ष सोडून जात असल्याच्या पत्रकाराच्या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज चांगलेच संप्तत झाले. चिडलेल्या पवारांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच फटकारले. इथं नातेवाईकांचा प्रश्न येतोच कुठे? असे प्रश्न तुम्ही विचारू कसे शकतात? असे प्रश्न विचारणार असता तर मी उठून जातो, असे म्हणून पवार पत्रकार परिषदेतून उठून चालले होते. परंतु नेत्यांच्या विनवणीनंतर राग गिळून पुन्हा प्रश्नांना सामोरे गेले.
श्रीरामपूर येथील सकाळी दहा वाजता बॅरिस्टर रामराव आदिक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने व रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार परिषदेत एक चांगलेच नाट्य पहायला मिळाले. सध्या अनेक आमदार व मोठे नेते वेगवेगळ्या कारणांमुळं राष्ट्रवादीला रामराम ठोकून सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या तंबूत जात आहेत. वर्षानुवर्षे पवारांना साथ देणाऱ्या दिग्गज नेत्यांचाही यात समावेश आहे.
पक्षांतराचे हे लोण अगदी पवारांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले आहे. पवारांचे नातेवाईक असलेले उस्मानाबादमधील वजनदार नेते पद्मसिंह पाटील हेही भाजपच्या वाटेवर आहेत. याच अनुषंगानं श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला गेला. या प्रश्नामुळं शरद पवार भडकले. ‘इथं नातेवाईकांचा प्रश्न येतोच कुठं?, असे प्रश्न तुम्ही कसे काय विचारू शकता?, तुम्ही माफी मागा, असं म्हणत थेट निघून जाऊ लागले. मात्र, सोबतच्या नेत्यांनी त्यांना व प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शांत केले. त्यानंतर पवार पुन्हा बसले.
किमान सभ्यता न पाळणाऱ्या लोकांना तुम्ही बोलवत जाऊ नका आणि त्यांना बोलवायचं असेल तर मला बोलवू नका, असं त्यांनी उपस्थितांना सुनावलं. ‘आपण गेलात तर बरं होईल,’ असंही पवारांनी संबंधित पत्रकाराला हात जोडून सांगितलं.
यावेळी पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्येकी 120 जागा तर उर्वरित 48 जागा मित्रपक्षांना देण्याचा विचार आहे. त्यादृष्टीने चर्चा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 60 आमदारांपैकी 52 आमदार मला सोडून गेले. 8 आमदारांच्या जोरावर मी पुन्हा उभा राहिलो. त्यामुळे कोणी गेले त्यांच्या बद्दल विचार करायची गरज नाही. पुन्हा नव्या दमाने पक्ष उभा राहिल. असे ते म्हणाले.