INDW vs BANW 1ST T20I : भारतीय महिला क्रिकेट संघाने 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाचा 44 धावांनी पराभव केला आहे. यासह भारताने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडूंनी निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 145 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 101 धावाच करू शकला. रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकर यांच्या धारदार गोलंदाजीने बांगलादेशी संघाच्या फलंदाजीला संघर्ष करायला भाग पाडले. रेणुका सिंगने 3 आणि पूजा वस्त्राकरने 2 बळी घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. रेणुका सिंग सामन्याची मानकरी ठरली.
For her splendid bowling and 3️⃣ wickets, Renuka Singh wins the Player of the Match award in the first T20I against Bangladesh 👏
Scorecard ▶️ https://t.co/MELhRqBh37#TeamIndia | #BANvIND pic.twitter.com/0ci06CuQ63
— BCCI Women (@BCCIWomen) April 28, 2024
बांगलादेशच्या संघाने पहिल्या 29 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. अशा स्थितीत संघाची कर्णधार निगार सुलतानाने अर्धशतकी खेळी खेळून संघाला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. सुलतानाने 48 चेंडूत 51 धावांची खेळी खेळली, यादरम्यान तिने 5 चौकार आणि 1 षटकारही लगावला. बांगलादेशच्या महिला संघाच्या 7 खेळाडूंना धावांच्या बाबतीत दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताने इतकी दमदार गोलंदाजी केली की बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाला शेवटच्या 5 षटकात केवळ 23 धावा करता आल्या.
भारताची शानदार फलंदाजी…
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली, परंतु स्मृती मानधना केवळ 9 धावा करून बाद झाल्याने संघाची सुरुवात चांगली झाली नाही. दरम्यान, शेफाली वर्माने 22 चेंडूत 31 धावांची तर यास्तिका भाटियाने 29 चेंडूत 36 धावांची खेळी खेळली. त्यांच्याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौरने 22 चेंडूत 30 आणि ऋचा घोषने 17 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे छोट्या भागीदारीमुळे भारतीय संघाला निर्धारित षटकात 145 धावा करता आल्या.