नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात केलेल्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या, सोमवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर होण्याची शक्यता आहे.
केजरीवाल यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, या प्रकरणात त्यांची अटक ही बेकायदेशीर असून हा मुक्त आणि निष्पक्ष लोकशाहीच्या तत्त्वांवर अभूतपूर्व हल्ला आहे.
या खटल्यातील त्यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थात ईडीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा आदर्श आचारसंहिता लागू झाली तेव्हा त्यांच्या अटकेची पद्धत आणि वेळ चुकीची आहे.
तसेच आम आदमी पक्ष (आप) आणि त्यांच्या नेत्यांना चिरडण्यासाठी मोदी सरकारने ईडी आणि त्याच्या व्यापक अधिकारांचा गैरवापर केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.